
नवी दिल्ली : पहलगाममधील २६ हिंदूंच्या टार्गेट किलींगनंतर भारताने मंगळवारी मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. तसेच रात्री १.०५ ते १.३० वाजेच्या दरम्यान अवघ्या २५ मिनीटात ७० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली.
भारतीय वायुसेना, नौदल आणि लष्कराने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. राफेल विमानांनी स्काल्प आणि हॅमर मिसाईल्सचा वापर करत पाकिस्तानात 4 ठिकाणी आणि पीओकेमध्ये 5 असा एकूण 9 ठिकाणी हल्ला केला. हे हल्ले भारतीय हद्दीतूनच करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना टार्गेट केले नाही. हा सर्जिकल स्ट्राईक योग्य वेळ, मर्यादित, अचूक आणि गैर-आक्रमक असल्याचे सांगितले. या हलल्यांचे नियोजन, गुप्तचर माहिती, सॅटेलाइट फोटो आणि संनाद यंत्रणेवर आधारित होते. भारतीय सैन्याने अवघ्या 25 मिनीटात 9 दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. यामध्ये बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, मार्कझ सुभान अल्लाह, मुरिदके येथील लष्कर-ए-तय्यबाचा मार्कझ तैबा, सियालकोट येथील मेहमूना जिया (हिजबुल मुजाहिदीन), तेहरा कलन येथील सर्जल (जैश), कोटली येथील मार्कझ अब्बास आणि मस्कर रहील शाहिद, मुजफ्फराबाद येथील शवई नाला आणि सय्यदना बिलाल तळ, तसेच बरनाला येथील मार्कझ अहले हदीस यांचा समावेश होता.
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुंछ आणि राजौरी येथील सीमावर्ती भारतीय गावांवर गोळीबार केला. त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला, तर 44 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नीलम-झेलम प्रकल्प आणि नागरी ठिकाणांवर हल्ले झाल्याचा खोटा दावा केला. पाकिस्तानचा दावा भारताच्या पीआयबी फॅक्टचेकने खोडून काढला. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ आणि पीओकेतील रहिवाशांनी शेअर केलेल्या फुटेजमुळे पाकिस्तानच्या क्रूरतेचा पुरावा समोर आला. भारताने अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, यूएई आणि रशियाला ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. दहशतवाद्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा मिळालाय. दोन्ही देशांनी शांतता बाळगावी, असे आवाहन यूएनकडून करण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरचे निरीक्षण केले, तर एनएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली.