
नवी दिल्ली: भारतात यंदा मान्सूनचे आगमन ८ ते १० दिवस आधीच होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने आज, मंगळवारी वर्तवला. आगामी १३ मे पर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल. त्यामुळे यावर्षी केरळात देखील वेळेपूर्वीच मान्सून पोहचण्याची शक्यता आहे. परंतु, नेमका किती तारखेला केरळात दाखल होईल याबाबत हवामान विभागाने तपशील दिलेला नाही.
देशभर गेल्या ५० दिवसांपासून उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले. बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. त्यामुळे मान्सून तयारीला लागला आहे.
दरवर्षी मान्सून अंदामान-निकोबार बेटावर १८ ते २२ मे च्या सुमारास येतो. मात्र तो यंदा किमान ८ ते १० दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटावर येण्याच्या तयारीत आहे, असे सॅटेलाईटने टिपलेल्या हालचालीतून दिसत असल्याचे अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. त्यामुळे तो केरळमध्ये सुद्धा किमान ५ ते ६ दिवस आधी दाखल होऊ शकतो, असे वरिष्ठ शास्त्रज्ञ सांगत आहेत.