अहिल्यानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक जनहिताचे निर्णय घेण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्याचा आणि आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्याचाही निर्णय झाला. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव देण्याचाही निर्णय एकमताने घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामासाठी ५५०३.६९ कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे मंजूर करण्यात आले. अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरू करण्याचा निर्णय झाला. राहुरीत वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय झाला. मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी २०२८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला. आधी या कार्यक्रमाचा कालावधी २०२२ ते २०२५ असा होता. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश २०२५ जारी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.