Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

India Pakistan Tension: पाकड्यांची रशियाकडे गयावया, भारताला समजावण्याची घातली गळ

India Pakistan Tension: पाकड्यांची रशियाकडे गयावया, भारताला समजावण्याची घातली गळ

नवी दिल्ली: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारतासोबत वाढता तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या मॉस्कोमधील राजदूताने रशियाची मदत मागितली आहे.


रशियाची भारतासोबत विशेष धोरणात्मक भागीदारी आहे आणि त्याचे पाकिस्तानशीही खूप चांगले संबंध आहेत, त्यामुळे १९६६ च्या ताश्कंद कराराप्रमाणे दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीसाठी पाकिस्तान रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा वापर करू इच्छित आहे.


ताश्कंदमध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील सशस्त्र संघर्ष संपवण्यास मदत केली होती.



भारत पाक तणाव कमी करण्यासाठी रशिया करणार मदत?


भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, रशियाने तणाव कमी करण्यासाठी मदतीची ऑफर दिली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांसोबतच्या चर्चेदरम्यान ही ऑफर दिली. रविवारी, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी लावरोव्हशी फोनवर चर्चा केली आणि मॉस्कोला प्रादेशिक घडामोडींबद्दल माहिती दिली. या चर्चेचा संदर्भ देत, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील तणावात लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात आले. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम भागात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर राजकीय तोडगा काढण्यासाठी रशिया काम करण्यास तयार आहे, जर इस्लामाबाद आणि नवी दिल्ली यांच्याकडून परस्पर इच्छाशक्ती असेल तर यावर भर देण्यात येईल.'



रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एस जयशंकर यांच्याशी साधला संवाद 


इशाक दार यांच्याशी बोलण्याच्या दोन दिवस आधी, म्हणजे शुक्रवारी लावरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवर संवाद साधला होता, या संभाषणात, लावरोव्ह यांनी दोन्ही बाजूंना १९७२ च्या शिमला करार आणि १९९९ च्या लाहोर घोषणेच्या भावनेनुसार पहलगाम हल्ल्यानंतर तणाव कमी करण्याचे आवाहन केले.


२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर हल्ला केला. यादरम्यान, नि:शस्त्र पर्यटकांना त्यांची ओळख विचारून गोळ्या घालण्यात आल्या. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका स्थानिक काश्मिरी युवकाचा देखील समावेश आहे.  या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आला, आणि त्यानंतरच भारत सारकारने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध कारवाईचे रणशिंग फुंकलं आहे.

Comments
Add Comment