
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान २०२५ दरम्यान घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. हा निकाल दुपारी १ वाजता मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.
मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बारावीला ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी चौदा लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी चौदा लाख सतरा हजार ९६९ जण परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्यांपैकी तेरा लाख दोन हजार ८७३ जण उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी संख्या कोकणमध्येच आहे. सर्वात कमी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या लातूर विभागात आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के एवढा लागला तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के एवढा लागला. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांतून विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
यंदा सहा लाख २५ हजार ९०१ मुली, तर सहा लाख ७६ हजार ९७२ मुलगे बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे.
विभागनिहाय निकाल २०२५
कोकण -९६.७४
कोल्हापूर ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६