
बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका कार्यक्रमादरम्यान, चाहत्याने सोनू निगम (Sonu Nigam) ला कन्नड गाणे गाण्यास सांगितले होते, त्यावर सोनूने कन्नड लोकांच्या भावना दुखावणारे आणि वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली, त्याच्याविरुद्ध बेंगळुरूमधील अवलाहल्ली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
सोनू निगमने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्यक्रमात नेमके काय घडले याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणतो की, "तिथे फक्त चार-पाच गुंड प्रकारचे लोकं होते जे खूप ओरडत होते. तिथे असलेले हजारो लोकं त्यांना थांबवतही होते. तिथे काही मुली होत्या ज्या त्यांना ओरडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यांना वातावरण खराब करू नका असे सांगत होत्या. पहलगाममध्ये जेव्हा पँट काढली गेली तेव्हा भाषा विचारली गेली नव्हती हे त्या पाच जणांना सांगणे आणि आठवण करून देणे आवश्यक होते."
"मला धमकावण्यात येत होते"- सोनू निगम
सोनू निगम व्हिडिओमध्ये म्हणाला, "पहिल्या गाण्यानंतर ४-५ मुलांनी मला धमकी देण्यास सुरुवात केली. ते कन्नड गाणे गाण्याची मागणी करत नव्हते तर ते धमकी देत होते. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारू शकता."
कन्नड लोकांचे कौतुक केले, पण काही लोकांवर टीका केली
सोनू निगम व्हिडिओमध्ये असे देखील म्हणाला आहे की, 'कन्नड लोक खूप गोड आहेत. पण, प्रत्येक ठिकाणी आणि राज्यात काही वाईट लोक देखील असतात. म्हणून, त्यांना हे सांगणे महत्त्वाचे आहे की ते प्रेक्षकांना धमकावून तुम्हाला गाण्यास भाग पाडू शकत नाहीत. मी कन्नड गाण्यांचा एक तासाचा सेट घेऊन आलो होतो, पण इतरांना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थांबवणे महत्त्वाचे आहे.'
नेमके काय आहे प्रकरण?
सोनू निगम काही दिवसांपूर्वी त्याच्या बेंगळुरूतील कॉन्सर्टमध्ये गाणं गात होता. यावेळी एका तरुणाने कानडी कानडी असं बोलायला सुरुवात केली. गायक सोनूने कानडी भाषेतले एखादे गाणे सादर करावे, अशी मागणी प्रेक्षकांमधून करण्यात आली होती. त्यावेळी तो जे काही बोलला त्यामुळे कानडी नागरिकांच्या भावना दुखावल्या. मला कन्नड माणसं आवडतात. माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण हे असं वागू नका. मागणी करणाऱ्या प्रेक्षकाच्या जन्माच्या आधीपासूनच मी कानडी गाणी गात आहे. पण प्रेक्षकाचे हे वर्तन मला आवडलेले नाही. पहलगाममध्ये जे घडले त्याला हेच कारण आहे, असं सोनू निगम म्हणाला होता.