
महिलांचा ओले बोंबील विकण्याकडे कल
मुंबई : ओल्या मासळीएवढीच सुक्या मासळीलाही (Dride Fish) खवय्यांची मोठी पसंती असते. त्यातही सुक्या बोंबीलला (Bombay Duck) सर्वाधिक मागणी असते; परंतु सध्या मच्छीमारांचा सुके बोंबील तयार करण्याकडे कल कमी झाला आहे. सुक्यापेक्षा ओल्या बोंबीलला भाव चांगला मिळू लागल्याने मच्छीमार तोच बाजारात विक्रीसाठी पाठवत असून सुके बोंबील विक्रीसाठी येण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. सुक्या मासळीमध्ये जवळा, करंदी व सुक्या बोंबीलला मागणी असते. विशेष करून, पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने खवय्ये सुक्या मासळीची बेगमी करून ठेवतात. त्यामुळे पावसाळ्याचे दोन महिने सहज निघून जातात; मात्र सुकी मासळी पावसाळ्यातच नाही तर एरवीदेखील चवीने खाल्ली जाते. मच्छीमार महिला आठवड्याच्या बाजारात पहाटेपासूनच या मासळीची विक्री करण्यासाठी येतात. भाईंदर पश्चिमेकडे दर रविवारी सुक्या मासळीचा बाजार भरतो. भाईंदरच नव्हे तर आसपासच्या गावातील रहिवासीदेखील सुक्या मासळीच्या व विशेष करून सुके बोंबील खरेदीसाठी येतात.

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज लखनऊ आणि पंजाव धर्मशाळा येथे पात्रता फेरीत पुढे जाण्यासाठी लढणार आहेत. लखनऊकडे सध्या १० गुण आहेत, तर पंजावकडे १३ गुण आहेत ...
मच्छीमारांनी समुद्रातून मासळी आणली की महिला त्यांची वर्गवारी करतात. त्यातील बोंबील, करंदी व जवळा वेगळा करून सुकायला टाकला जातो. करंदी, जवळा जमिनीवर अंथरून सुकवला जातो; मात्र बोंबील सुकविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. बोंबील सुकविण्यासाठी समुद्रकिनारी बांबू बांधले जातात, मग एकेक बोंबील त्यावर सुकविण्यासाठी टाकले जातात. बांबूवर वाळलेले बोंबील गोळा करून ते पुन्हा जमिनीवर सुकविण्यासाठी पसरवले जातात. त्यानंतर वाळवून कडक झालेले बोंबील गोळा करून त्याची साठवणूक केली जाते. हे बोंबील त्याच्या प्रतीनुसार बाजारात शेकडा शंभर ते दोनशे रुपयांना विकले जातात. ओल्या बोंबीललाही खवय्यांची पसंती असते. याआधी ओल्या बोंबीलला ५०० रुपये प्रती ५० किलो असा दर मिळत होता; मात्र ओल्या बोंबीलला बाजारात प्रचंड मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे ओल्या बोंबीलची ५० किलोची पाटी आता तब्बल चार हजारांना विकली जाऊ लागली आहे. साहजिकच मच्छीमार महिलांचा ओले बोंबील विकण्याकडे कल वाढू लागला आहे.
परदेशातूनही मागणी
सुक्या बोंबीलला परदेशात, तसेच इतर राज्यांतही मोठी मागणी आहे. भारतातून परदेशात स्थायिक झालेले सुक्या बोंबीलची मागणी करतात व त्यांचे येथील नातेवाईक ते जमेल त्या मार्गाने सुके बोंबील पाठविण्याची व्यवस्था करतात. उत्तर भारतात, उत्तर प्रदेश व बिहार आदी राज्यातही सुक्या बोंबीलला चांगली मागणी आहे; मात्र बाजारात सुके बोंबील विक्रीला येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.