Saturday, May 3, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पाकिस्तानी जहाजांवर भारतात प्रवेशबंदी

पाकिस्तानी जहाजांवर भारतात प्रवेशबंदी

नवी दिल्ली : भारत सरकारने पाकिस्तानी जहाजांवर देशात प्रवेशबंदी लागू केली आहे. कोणत्याही भारतीय बंदरात तसेच भारताच्या सागरी हद्दीत पाकिस्तानचे जहाज प्रवेश करू शकत नाही अथवा थांबू शकत नाही; असा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. याआधी भारत सरकारने पाकिस्तानी मालाच्या आयातीवर भारतात बंदी लागू केली आहे. केंद्र सरकारने आधीच पाकिस्तानी विमानांना भारतात आणि भारताच्या हवाई क्षेत्रात बंदी लागू केली आहे.

पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. अतिरेकी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे पुरावे भारताला मिळाले. यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतला आहे. भारतात आणि भारताच्या सागरी क्षेत्रात तसेच बंदरांवर पाकिस्तानच्या जहाजांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी विमानांना भारतात आणि भारताच्या हवाई क्षेत्रात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी मालाच्या आयातीवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत तसेच पाकिस्तानच्या भारतातील दुतावासातले कर्मचारीही कमी केले आहेत. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे. या लागोपाठच्या निर्णयांमुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे.

भारत सरकारने पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घातली आणि भारतीय जहाजांना पाकिस्तानमधील बंदरांमध्ये जाण्यास किंवा पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात जाण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. देशाच्या जहाजबांधणी महासंचालनालयाने हा आदेश जारी केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक हितांचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताने अटारी सीमेवरुन पाकिस्तानसोबत होणारा व्यापार थांबवला आहे. व्यापारासाठी अटारी सीमेचा वापर पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.

भारत - पाकिस्तान दरम्यान सीमेवर दररोज गोळीबार सुरू आहे. अतिरेक्यांनी हल्ला केला त्या दिवसापासून दररोज पाकिस्तानकडून भारताच्या चौकी - पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार केला जातो. या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिले जाते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी गोळीबाराच्या घटना घडत आहेत. शुक्रवार २ मे आणि शनिवार ३ मे दरम्यान रात्री पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार केला. ज्याला भारतीय सैन्याने तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले. तणाव वाढू लागला आहे. भारत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोठी लष्करी कारवाई करेल, अशी भीती पाकिस्तानच्या मनात घर करू लागली आहे. या भीतीपोटी पाकिस्तानच्या सीमेजवळची अनेक गावं रिकामी झाली आहे. ग्रामस्थ घर बंद करुन मौल्यवान चीजवस्तू घेऊन सुरक्षित ठिकाण गाठू लागले आहेत. अनेक बँकांनी पाकिस्तानमध्ये सीमेजवळच्या जिल्ह्यांतील त्यांच्या शाखा बंद केल्या आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची आणि भीतीची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या नातलगांना युरोपमध्ये स्थलांतरित केले आहे.

भारतीय टपाल विभागाने जारी केले निर्बंध

पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपालावर बंदी घालण्यात आली आहे. पहलगाममध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केल्याचे उघड झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाकिस्तान सोबतचा व्यापार, दळणवळण, संपर्क, सर्व तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपालावर भारताने बंदी घातली आहे.

 
Comments
Add Comment