
मुंबई : जग जेव्हा कथाकथनाच्या नवीन पद्धती शोधत असते, तेव्हा भारताकडे हजारो वर्षांच्या कालातीत, विचार करायला लावणाऱ्या आणि खरोखरच जागतिक कथांचा खजिना आहे. त्या (कथा) केवळ संस्कृतीबद्दलच नाही तर विज्ञान, शौर्य, कल्पनारम्य, धैर्याबद्दल देखील आहेत. आपला खजिना प्रचंड आहे आणि तो जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणे, नवीन पिढीसमोर सादर करणे ही वेव्हज प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे.
‘भारतात निर्माण करा, जगासाठी तयार करा, ही संकल्पना स्वीकारण्याची योग्य वेळ आहे’, असे म्हणत, वेव्हज हे एक वेव्हज आहे, ते सांस्कृतिकता, जागतिक संपर्कतेचा सेतू आहे. भारतात येऊन जागतिक स्तरावरील कंटेंट तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन क्षेत्रातील निर्मात्यांना केले.
पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या घोषवाक्याने प्रेरित १ ते ४ मे दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योजक आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीत शुभेच्छा देत उपस्थितांची मने जिंकली.
पंतप्रधान मोदींचे निर्मात्यांना आवाहन
जागतिक निर्मात्यांना आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत नेहमीच सभ्यतेच्या मोकळेपणाचे पालन करत आला आहे. पारशी आणि यहूदी बाहेरून आले आणि येथे एक झाले. जगभरातील निर्मात्यांनी मोठी स्वप्ने पाहावी, त्यांनी इथे येऊन काम करावे आणि भारतीय प्रतिभेला ओळख द्यावी, असे ते म्हणाले.
भारतीय सिनेमाचे केले कौतुक
आजपासून ११२ वर्षांपूर्वी २ मे १९१३ रोजी भारतात पहिली फिचर फिल्म राजा हरिश्चंद्र रिलीज झाली होती. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके होते. कालच त्यांची जयंती झाली. गेल्या एका शतकात भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवले आहे. गुरुदत्त यांची सिनेमॅटिक पोएट्री असो किंवा ऋत्विक घटक यांचे सोशल रिफ्लेक्शन असो. ए आर रहेमान यांचे संगीत असो की राजामौलींची महागाथा असो, प्रत्येक कहाणी भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगाच्या मनात बसली आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी भारतीय सिनेमाचे कौतुक केले.