
मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकड्यांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढू लागला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे पाणी बंद केले, अटारी सीमा बंद करण्याआधी भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच आता पाकिस्तानमध्ये, पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने देशभरात भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने निवडक राजनैतिक निर्णय घेतले. या निर्णयांमुळे पाकिस्तानची कोंडी झाल्याचे चित्र आहे. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. पाकिस्तानच्या अनेक नागरिकांना भारत सोडावा लागला आहे. भारतामध्ये पाकिस्तानच्या अनेक नागरिकांची सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आली आहेत. निवडक पाकिस्तानी यू ट्युब चॅनलवर भारतात बंदी लागू झाली आहे. भारताच्या कारवाईला उत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या सरकारी रेडिओवर भारतीय गाणी न वाजवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारने १ मे रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की आता पाकिस्तानमध्ये बॉलिवूड गाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, 'आता पाकिस्तानी एफएम रेडिओ स्टेशनवर भारतीय गाणी वाजवली जाणार नाहीत. संपूर्ण देशासाठी म्हणून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.