Thursday, May 1, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र दिनीच दादरमधील 'ती' मराठी शाळा होणार कायमची बंद!

महाराष्ट्र दिनीच दादरमधील 'ती' मराठी शाळा होणार कायमची बंद!

मुंबई : १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याचवेळी मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली होती. त्यामुळे दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) किंवा मराठी भाषा दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु याच दिवशी मुंबईतील दादर येथील एका मराठी शाळेला टाळं लावलं जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरीही बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांची आणि पालकांची इंग्रजी भाषेची ओढ पाहता राज्यभरात मराठी शाळेचे प्रमाण कमी झाले आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्यामुळे शाळा कायमच्या बंद होण्याच्या वाटेवर आले आहेत. गेल्या काही वर्षात मराठी शाळा झपाट्याने कमी होताना दिसताय. पटसंख्येअभावी मराठी शाळा विलीन कराव्या लागत आहेत. अशातच यामध्ये आता दादरमधील 'इंडियन एज्युकेशन सोसायटीचे नाबर गुरुजी विद्यालय' या शाळेचा देखील समावेश होणार आहे.

एकेकाळी विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनसाठी मोठी रांग असणाऱी दादर पश्चिमेकडील नाबर गुरुजी विद्यालय ही शाळा आता बंद होणार आहे. पटसंख्या कमी होत असल्याने शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून आज ३० एप्रिल हा शाळेचा शेवटचा दिवस असणार आहे. या शाळेत यंदा दहावीला २४ विद्यार्थी शिक्षण घेत होते.  आता आठवी इयत्तेत ९ विद्यार्थी आणि नववी इयत्तेत ९ विद्यार्थी असे संपूर्ण शाळेत मिळून एकूण १८ विद्यार्थी उरले आहेत. त्यामुळे माध्यमिक विभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सोशल मीडियात नाराजीचा सूर उमटत आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण

सध्या पालकांमध्ये  इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण वाढताना दिसत आहे. सध्या ८० टक्के विद्यार्थी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये जातात, जिथे मराठी ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते. यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व कमी होत आहे. शहरीकरण आणि स्थलांतरामुळेही मराठी शाळांवर परिणाम होताना दिसतोय. शहरी भागात मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मराठी शाळांचे प्रमाण कमी होत आहे, कारण लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देतात. तसेच, स्थलांतरामुळे गावातील शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे.

मराठी शाळेचे अस्तित्व धोक्यात

गेल्या काही वर्षांत पटसंख्या घटल्याने आता ही शाळा परवडत नसल्याचे कारण देत जुनी आणि नामवंत मराठी शाळा अस्तित्वाच्या संकटात सापडली असल्याने आता ही शाळा वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सतीश नायक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले की, मराठी माध्यम विभाग टिकवण्यासाठी व चालू ठेवण्यासाठी शाळेने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असले, तरीही माध्यमिक शाळेत मराठी विभागातील एकूण विद्यार्थीसंख्या ६०च्या खाली गेली आहे. यंदा ३५ विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्डाच्या परीक्षेला हजेरी लावली आहे. निकालानंतर त्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. निकालानंतर, मराठी विभागात केवळ १५ ते १८ विद्यार्थी शिल्लक राहतील.

Comments
Add Comment