संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम करत आहोत. ही एक चूक होती आणि त्याचे आम्हाला दुःख होत आहे; असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत सांगितले. पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वतःच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली.
संयुक्त राष्ट्रांमध्ये या मुलाखतीचा संदर्भ देत भारताच्या उप स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानची हजेरी घेतली. पाकिस्तानने स्वतःच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली आहे. यात आता आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. पण पाकिस्तानने अखेर स्वतः कबुली दिली आहे आणि याची जगाने दखल घ्यायलाच हवी. पाकिस्तानच दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे. पाकिस्तानमुळेच दहशतवाद पसरत आहे. प्रदेशातील वातावरण अशांत आणि अस्थिर झाले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसमोर जग डोळे बंद करुन राहू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा आरोप
पहलगाम अतिरेकी हल्ला
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नाव आणि धर्म विचारुन २५ हिंदू पर्यटकांना ठार करण्यात आले. पर्यटकांसोबत असलेल्या एका स्थानिकालाही मारण्यात आले. अतिरेक्यांनी आधुनिक शस्त्रांद्वारे २६ नागरिकांची हत्या केली. या घटनेनंतर लष्कर – ए – तोयबा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी घेतली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी एका मुलाखतीत बोलताना दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची कबुली दिली.