नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत. भारत आणि फ्रान्सच्या सरकारमध्ये राफेल खरेदीचा करार झाला आहे. भारताच्या नौदल आणि हवाई दलाने युद्धाभ्यास केला आहे. लष्कर हाय अलर्टवर आहे. मागील चार पाच रात्रींपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. आता भारताच्या सैन्यात तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. नवे अधिकारी त्यांच्या कामकाजाची औपचारिक सुरुवात १ मे रोजी करतील. याआधी ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ते आधीच्या अधिकाऱ्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रांमध्ये घेतली हजेरी
भारतीय हवाई दलातून एअर मार्शल एसपी धारकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. नवे एअर मार्शल म्हणून नर्मदेश्वर तिवारी हे पदभार स्वीकारणार आहेत. सध्या तिवारी गांधीनगर येथे असलेल्या हवाई दलाच्या नैऋत्य विभागाच्या कमांडचे प्रमुख आहेत. तिवारी यांना बढती मिळत असल्यामुळे नैऋत्य विभागाच्या कमांडची जबाबदारी तिथेच कार्यरत असलेल्या मुख्य प्रशिक्षक असलेल्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला आहे.
लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांच्या जागेवर एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे चीफ्स ऑफ इंटिग्रेटेड डीफेन्स स्टाफ कमिटीमध्ये पदभार स्वीकारणार आहेत. ते सध्या प्रयागराजच्या सेंट्रल एअर कमांडचे प्रमुख आहेत. भारताचे मिराज २००० हे लढाऊ विमान उडवण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.
लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हाती घेणार आहेत. नॉर्दन आर्मी कमांड ही जम्मू काश्मीर आणि लडाख तसेच सियाचीन येथील सर्व लष्करी कारवायांवर नियंत्रण ठेवते. पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी याच कमांडकडून निर्देश दिले जातात.