
नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर कारवाईची मागणी केली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्यां अध्यक्षांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैछकीत सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी होते.
पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिली सूट
सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक सुमारे अडीच तास सुरू होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी लष्कराला पूर्णपणे सूट दिली आहे. ते म्हणाले, दहशतवादाला उत्तर देणे आमचा दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. त्यांनी यावेळेस भारतीय सैन्य दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आमची प्रत्युत्तर कारवाईची पद्धत काय आहे, टार्गेट्स काय असतील आणि याची योग्य वेळ काय असेल या प्रकारचे ऑपरेशन निर्णय घेण्यासाठी सैन्य दलाला संपूर्ण सूट देण्यात आली आहे.
पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता. यावेळेस पंतप्रधानांनी या हल्ल्याचा कट रचणारे तसेच दहशतवाद्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.