मुंबई(ज्ञानेश सावंत): आज जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. पहिल्या फेरीतील सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानया ५८ धावानी पराभव केला. गुजरातचा संघ १२ गुणांसह गुण तक्त्यात अव्वल आहे, तर राजस्थान रॉयल्सने फक्त चारच गुण मिळवले आहेत. त्यांच्यासाठी जिंकणे गरजेचे आहे कारण हरल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.
या हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ फार कमी धावानी पराभूत झाला आहे. त्यांनी २-३ सामने अगदी हातातोंडाशी आल्यावर पराभूत झाले. त्यांची सुरुवात तर यशस्वी जयस्वाल चांगली करतो पण मधल्या फळीतील फलंदाजांकडून त्याला चांगली साथ मिळत नाही. नितीश राणा, हेटमायर, जुरेल हे फलंदाज फिनिशर म्हणून खेळत नाही आणि त्यामुळे त्यांना सामना थोड्या धावांनी गमवावा लागतो. गोलंदाजीमध्ये आर्चर हाच नेहमी चांगली खेळी करतो आहे; परंतु संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे यांच्याकडून चांगली साथ मिळत नाही आहे.
राजस्थानला आजचा सामना जिंकायचा असेल, तर फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबतीत बदल करावे लागतील. रियान परागला त्याच्या कर्णधार पदाची जबाबदारी पार पाडावी लागेल, जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा मैदानावर संयमाने खेळून धावा कराव्या लागतील. गुजरात बाकी त्याचा नेहमीचा खेळ करेल, ते सामना जिंकून पात्रता फेरीत आपले स्थान कायम करण्याचा प्रयत्न करतील. चला तर बघूया राजस्थान गुजरातची घोडदौड थांबवणार का?