२२ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष वेन्स हे भारतात होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये देशाच्या विविध भागांतून आलेले हजारो पर्यटक निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पर्यटन व्यवसाय बहरत असताना दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २६ हिंदू पर्यटकांना समोरून गोळ्या घातल्या. काश्मीरचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन खोऱ्यात निरपराध व निष्पाप पर्यटकांच्या हत्याकांडाने रक्ताचा सडा पडला. त्या दिवशी बैसरनमध्ये येऊन कोणी घोडेस्वारीचा आनंद घेत होते, कोणी खाण्यापिण्यात मस्त दंग होते, मुले खेळत होते, मस्ती करत होते, कोणी फोटो काढत होते, तर कोणी व्हीडिओ शूटिंगमध्ये निसर्गाचे सौंदर्य टिपत होते. अचानक गोळीबाराचे आवाज आले, पोलिसांच्या गणवेषात काही धावताना दिसले, पोलिसांबरोबर कुणाची तरी चकमक चालू आहे असे पर्यटकांना क्षणभर वाटले पण ते तरुण दहशतवादी हातात बंदूक घेऊन प्रत्येकाला नाव विचारायला लागले, तू हिंदू का मुस्लीम असा प्रश्न थेट विचारू लागले, कलाम पढायला सांगू लागले आणि एकापाठोपाठ एक अशा हिंदू पर्यटकांना डोक्यावर, छातीवर गोळ्या घालून ठार मारू लागले. पत्नी आणि मुलांसमोर त्यांनी पुरुष पर्यटकांवर गोळ्यांचा वर्षाव केला. एवढा मोठा रक्तपात काश्मीर खोऱ्यात कित्येक वर्षांत घडला नव्हता. त्या दिवशी पहलगाम परिसरात अडीच हजार पर्यटक होते. बैसरनच्या पठारावर मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती असे विविध भाषिक पर्यटक जमले होते. दहशतवाद्यांनी कोणालाही त्यांची जात, त्यांचा प्रांत किंवा त्यांची भाषा कोणती असा प्रश्न विचारला नाही, तर ते कोणत्या धर्माचे आहेत एवढाच प्रश्न विचारत होते… काहींनी पर्यटकांकडे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली, ज्या पर्यटकांविषयी संशय आला त्यांच्या अंगावरची पँट काढून खतना तपासला. खतना न केलेल्यांना त्यांनी जवळून गोळी घातली, जे गप्प बसले, तेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.
पहलगाम हे पर्यटकांचे मोठे आकर्षण स्थळ आहे. सर्व देशांतून काश्मीरमध्ये येणारे पर्यटक श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम येथे हमखास येतात. पहलगाम हे भारत-पाकिस्तान सरहद्दपासून बरेच दूर आहे. सरहद्दीपासून पहलगामला पोहोचायला आठ तास तरी लागतातच. अशा दूर अंतरावर पाकिस्तानमधून आलेले प्रशिक्षित व सशस्त्र दहशतवादी पोहोचले तरी कसे? हे गूढ अजून उकललेले नाही. किश्तवाडमधून त्रालच्या दाट जंगलातून हे पायपीट करून आले असण्याची शक्यता आहे. पण ते पहलगामला पोहोचून तेथे २६ हिंदू पर्यटकांचे रक्ताचे सडे उडवेपर्यंत जम्मू-काश्मीर पोलीस, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, निमलष्करी दले आणि लष्करी सैन्यदलालासुद्धा त्याचा थांगपत्ता लागला नाही, याचे मोठे आश्चर्य वाटते. जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वात मोठा संवेदनशील व हाय सिक्युरिटी झोन आहे. पाकिस्तानच्या सरहद्दीला लागून हे राज्य आहे. चोवीस तास डोळ्यांत तेल घालून तेथे घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. मग यावेळी आपण कमी कुठे पडलो ?
पाकिस्तानच्या सीमेवरून दहशतवादी घुसले तेव्हा आपले सुरक्षा दल कुठे होते? दहशतवादी हे पोलिसांच्या किंवा लष्करी सैनिकांच्या गणवेषात पहलगामला आले होते, त्यांना सुरक्षा दलाचे गणवेष कुणी पुरवले? ते त्यांनी कुठे अंगावर घातले? अंगावरचे कपडे कुठे बदलले व कुठे लपवून ठेवले? पहलगाममध्ये अडीच हजार पर्यटक असताना ज्या बैसरनमध्ये हत्याकांड घडले त्याच्या जवळपास कुठेही सुरक्षा व्यवस्था नव्हती. कुठेही पोलीस चौकी नव्हती. कुठेही गस्त नव्हती. दहशतवाद्यांना रोखायला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नसावी हे असे कसे घडू शकते? विशेष म्हणजे गोळीबार झाल्यावर व २६ पर्यटकांची हत्या झाल्यावर दहशतवादी तिथेच काही काळ होते पण सुरक्षा व्यवस्थेला काही कळू शकले नाही, हे चिंताजनक आहे. दहशतवादी निश्चितच हत्याकांड घडविण्यापूर्वी अगोदर आलेले असणार. ते काही बंदुका हातात घेऊन जंगलात फिरत बसणार नाहीत, मग ते कुठे राहिले, कुठे जेवले, त्यांना मदत करणारे स्थानिक कोण आहेत? घटनेनंतर पाच दिवस उलटले तरी त्याचा तपशील बाहेर आला नाही.
मोदी सरकारच्या ०२ कारकिर्दीत पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्व देशाचा थरकाप उडला होता. दहशतवादी देशात कसे घुसले? तिथपर्यंत कसे पोहोचले, सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसपर्यंत ते कसे पोहोचू शकले? साडेचारशे किलो आरडीएक्स हाय सिक्युरिटी झोनमध्ये कसे येऊ शकले? सुरक्षा दलाचे जवान विमानाने न जाता बसेसमधून प्रवास करीत आहेत ही माहिती दहशतवाद्यांपर्यंत कशी पोहोचली? पुलवामा हल्ला करणारे दहशतवादी कोण आहेत, कुठे आहेत? पुलवामाचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोटला एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे असंख्य अड्डे उद्ध्वस्त केले असे सांगितले गेले, मग त्यानंतरही काश्मीरवर दहशतवादी हल्ले कसे चालू राहिले? तेव्हा ४४ सुरक्षा दलाच्या सैनिकांची हत्या झाल्यावर इंटेलिजन्सचे अपयश म्हणून आरोप झाले, आता पहलगाम पर्यटकांच्या हत्याकांडानंतरही इंटेलिजन्सवर खापर फोडले जात आहे. पुलवामा हत्याकांडानंतर जम्मू-काश्मीरचे तत्कालीन उपराज्यपाल सतपाल मलिक यांनी त्या घटनेबाबत सरकारला दोष दिला होता. सरकारने दुर्लक्ष केले, असे म्हटले होते. पण त्या घटनेला कोण जबाबदार आहे हे कधी समजलेच नाही.
पहलगाम हत्याकांडाची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या द रेजिस्टेंस फ्रंट (टीआरएफ)ने घेतली होती ती नंतर घुमजाव करून झटकली.दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग येथून किश्तवाड मार्गे बैसरनला पोहोचले. बर्फाच्छादीत पर्वतांनी वेढलेल्या बैसरनच्या पठारावर दहशतवादी दुपारी ३ वाजता पोहोचले तेव्हा देशाच्या विविध भागांतून आलेले पर्यटक त्यांच्या मित्र मंडळी व परिवारासह मौज-मजा मस्तीत आनंद लुटत होते. आपल्याला कोणी प्रतिकार करणारे नाही, पर्यटक नि:शस्त्र आहेत. जवळपास कुठेही सुरक्षा व्यवस्था नाही. हे दहशतवाद्यांना पूर्ण ठाऊक असावे. बैसरनपासून ५ किमी अंतरावर सीआरपीएफचा कॅम्प आहे, पण त्याचीसुद्धा दहशतवाद्यांना पर्वा नव्हती.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २०० निरपराध मुंबईकरांचा बळी गेला. मुंबई पोलीस दलातील धाडसी व आक्रमक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही दहशतवाद्यांशी लढताना मरण आले, पण मुंबई पोलिसांनी आलेले सर्व दहशतवादी वेचून वेचून ठार मारले. एवढेच नव्हे तर अजमल कसाबला पोलिसांनी जिवंत पकडला व पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा सर्व जगाला दाखवला. त्याच कसाबला नंतर फाशी झाली. संसदेवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हाही सर्व दहशतवादी संसदेच्या प्रांगणातच ठार मारले गेले. मुंबईवरील आणि संसदेवरील हल्ल्यात दहशतवादी हे लष्करी गणवेषात होते. तसेच पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातही दहशतवादी लष्करी गणवेषात होते. दुर्दैवाने पुलवामा येथील हल्ल्यात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा म्हणून कोणाला पकडून जगाला दाखवता आलेला नाही. पहलगाम येथे हत्याकांड घडविणारे दहशतवादी कसे-कुठे पसार झाले ते अजून समजलेले नाही.
गेली सहा दशके जम्मू-काश्मीरला घटनेतील ३७० कलमानुसार विशेष दर्जा होता. जम्मू-काश्मीरचा झेंडा सुद्धा वेगळा होता. केंद्राने केलेले कायदे काश्मीरच्या विधानसभेने मंजूर केल्यावर तिथे लागू होत असत. काश्मीरमध्ये हिंदुस्थानातील कोणात्याही व्यक्तीला मालमत्ता खरेदी करता येत नसे. मोदी सरकारने ३७० वे कलमच काढून घेतले, त्यावर संसदेने शिक्कामोर्तब केले. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लेह लडाख वेगळा केला. काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश केला. काश्मीरला विधानसभा दिली, पण पूर्ण दर्जा अजून मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त अधिकार तेथील उपराज्यपालाला आहेत. पण अशा मुद्द्यावरून काश्मीरमध्ये असंतोष व अशांतता कशी निर्माण होईल यासाठी पाकिस्तान सतत प्रयत्न करीत असतो. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे भारताच्या विरोधात नेहमीच गरळ ओकण्याचे काम करीत असतात. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी इस्लामाबाद येथे एका परिषदेत ते म्हणाले, काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे. ती कधीही विसरली जाणार नाही. काश्मिरी बांधवांना त्यांच्या शौर्यपूर्ण संघर्षात एकटे सोडणार नाही…
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ म्हणाले, भारताने पाकिस्तान शहरात घुसून कारवाई केल्यास त्याची किंमत भारताला मोजावी लागेल. जर पाकिस्तानी नागरीकांना काही इजा झाली, तर भारतीय नागरीक सुरक्षित राहणार नाहीत… (पहलगाममध्ये निरपराध २६ हिंदू पर्यटकांच्या भीषण हत्याकांडानंतर भारताने गप्प बसून सहन करावे असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना वाटते काय?) पहलगाम हत्याकांडानंतर त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, हल्ला करणारे स्वातंत्र्य सैनिक असू शकतात अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने व्यक्त केली होती म्हणूनच अजमल कसाबसारखा दहशतवादी चेहरा जिवंत पुरावा म्हणून भारताला, जगाला पुन्हा एकदा दाखवावा लागेल… पहलगामची घटना म्हणजे पाकिस्तानकडून भारतावर हमाससारखा झालेला हल्ला आहे. आता भारत सरकार इस्त्रायलप्रमाणे सडेतोड उत्तर देणार याची सारे जग वाट पाहत आहे. पहलगाममध्ये हत्याकांड घडवून पाकिस्तानने भारताच्या विरोधात फार मोठा जुगार खेळला आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…
मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…
जळगाव : सैराट चित्रपटात (Sairat Movie) जसा पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणांवर प्राणघातक हल्ला होतो,…
मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. अशातच आता भारतात सुरू…
नवी दिल्ली: पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. या हल्ल्यामध्ये…
सोलापूर : सोलापूरकरांची (Solapur News) आतुरता असलेल्या विमानसेवेसंदर्भातील महत्वाची माहिती आता समोर आली आहे. मागील…