Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखपहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते तळाशी असलेल्या कन्याकुमारीपर्यंत असणाऱ्या प्रत्येक भारतीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीयांच्या हाताच्या मुठी आवळल्या जात आहेत. प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये या हल्ल्याप्रती सूडाची भावना जागरुक झाली असून पाकिस्तानी दहशतवादाला ठेचून काढण्याची भाषा उघडपणे बोलली जाऊ लागली आहे. भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा धर्म विचारून झाला आहे. दहशतवाद्यांनी पंतप्रधान मोदींचे नाव घेत, त्यांना निरोप द्या, असे सांगत निर्ढावल्याप्रमाणे भारतीय भूमीवर गोळीबार केला आहे. भारताच्या विरोधात भारताच्या भूमीवर येऊन केलेला बेछूट गोळीबार हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला दिलेले एक प्रकारचे आव्हान आहे. या पर्यटकांमध्ये मृत्युमुखी पडलेले काही पर्यटक, तर नवीन विवाह झालेले असून भारताच्या स्वर्गभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये हनीमूनसाठी गेले होते. आपला मुलगा नवसंसाराची सुरुवात करण्यासाठी काश्मीरला जातो काय आणि दहशतवादी हल्ला करून त्याचे पार्थिव घरी येते काय, जी नववधू घरातून गेली होती, तीच नववधू विधवा बनून घरात परतते काय, हा सर्वच संतापजनक प्रकार आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स हे चारदिवसीय भारत दौऱ्यावर आले होते, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. हे सर्व पूर्वनियोजित होते. अचानक घडलेले नाही. जाणीवपूर्वक घडवून आणले गेले आहे. अर्थात त्यासाठी पूर्वतयारीही जोरदार करण्यात आली होती. हा हल्ला पाकिस्ताननेच घडवून आणला आहे, हे उजेडात आले आहे. सरकारने लवकरात लवकर कारवाई करून या घटनेचा बदला घ्यावा, यासाठी केंद्र सरकारवरही भारतीयांचा दबाव वाढत चालला आहे. भारत सरकारनेदेखील त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असल्याने पाकिस्तानला नजीकच्या काळात पहलगाम हल्ल्याची जबरी किंमत मोजावी लागणार असल्याचे संकेत विविध घडामोडींतून व बैठकांतून प्राप्त होऊ लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ पहलगामकडे धाव घेत मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली. तेथील सुरक्षा यंत्रणांकडून घडल्या प्रकाराची माहिती घेतली.

पंतप्रधान मोदी हे जरी त्यावेळी सौदी अरेबियात असले तरी त्यांनी अमित शहा यांना निर्देश देत तपशीलवार आढावा जाणून घेतला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही लष्कराच्या तीनही दलांची बैठक घेऊन कोणत्याही क्षणी काही घडण्याची शक्यता लक्षात घेऊन तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट टाकून भारतात परतले. भारतात परतताना त्यांनी पाकिस्तानी हद्दीचा वापर न करता पाकिस्तानला सूचक इशारा देण्याचे कार्यही कृतीतून केले आहे. पंतप्रधानांनी भारतात येत तातडीची बैठक घेतली. लष्कर आणि संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांना यावेळी पूर्ण ब्रिफिंग करण्यात आले. त्यानंतर, अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पराराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्तानविरोधात ५ मोठे निर्णय घेत ५ तगडे धक्के पाकिस्तानला देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या दिल्ली दूतावासातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सांगताना पुढील ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर १ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे, तसेच भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अानुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी भारतवासीयांकडून करण्यात येत आहे. घडलेली घटना भारतासाठी क्लेषदायी असून अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात असताना हा हल्ला घडवून भारतात आलबेल नसल्याचे पाकिस्तानने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद ठेचून काढला जाईल, दहशतवादाला माफी नसल्याचा इशारा भारताने दिला आहे. भारतानेही पाकिस्तानचा हिशोब कायमचाच चुकता करावा, पुन्हा असे करण्याचे धाडस पाकिस्तानचे होता कामा नये, असा सूर भारतीयांकडून उघडपणे आळविला जात आहे. देशाच्या शत्रूंनी केवळ निष्पाप पर्यटकांवर नव्हे, तर भारताच्या आत्म्यावरच हल्ला करण्याचे धाडस केले आहे. दहशतवाद्यांच्या हाती उरलेली थोडी-फार जमीनसुद्धा आता हिरावून घेण्याची वेळ आली आहे.

आज बिहारच्या भूमीवरून मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांची ओळख पटवेल, त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल. आपण त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू. आपण त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग करू. दहशतवादामुळे भारतीयत्वाचे स्पिरीट कधीही कमी होणार नाही. दहशतवादाला माफ केले जाणार नाही. पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांची ओळख पटवू, त्यांना शोधून काढू आणि त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देऊ, असा वज्रनिर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला. हल्ला करणारे दहशतवादी आणि याचा कट रचणारे त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन शिक्षा भोगतील. देशाच्या शत्रूंनी भारतीयत्वाच्या स्पिरीटवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे, असे सांगत भारत लवकरच या घटनेचा हिशोब चुकता करणार असल्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. २६/११ची घटना असो अथवा पुलवामा हत्याकांड असो, तसेच परवाचा पहलगामचा गोळीबार असो, पाकिस्तान कुरापती काढतच आहे. १९४७ पासून आपण पाकिस्तानाचे उद्योग, कुरापती सहन करत आहोत, पण आता याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. पाकिस्तानला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. आता जर कच खाल्ली तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या… प्रमाणे पाकिस्तान नव्याने पुन्हा दहशतवादी कृत्य करेल. पाकिस्तानच्या कृत्याची भारताने आजवर न भरुन येणारी किंमत मोजली आहे, यातना भोगली आहे. पाकिस्तानचे हे कर्ज सव्याज भारताने फेडणे आवश्यक आहे. भारतातील जनता सरकारसोबत आहे. धडा शिकवण्यासाठी भारताची जनता आता टाहो फोडत आहे. सरकारही लवकरच भूमिका घेईल, त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. जैसी करनी, वैसी भरनी काय असते, ते आता पाकिस्तानला समजलेच पाहिजे…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -