चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू
हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये आजच्या MI विरुद्ध SRH सामन्यात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयद्वारे काही मोठे बदल करण्यात आले आहे.
आज, बुधवारी (२३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2025 ) चा ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्ध, या सामन्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चार मोठे बदल केले आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम, हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्यादरम्यान पंच आणि खेळाडू दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील. त्याचप्रमाणे आजचा सामना चिअरलीडर्स आणि फटाक्यांच्या आतषबाजी शिवाय खेळवला जाणार आहे.
MI vs SRH सामन्यात मोठे बदल
आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने पहलगाम, काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली देण्याकरिता खेळात काही बदल केले आहेत.
यामधील पहिला सर्वात मोठा बदल म्हणजे सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू आणि पंच हातावर काळी फित बांधणार आहेत.
तर दुसरा मोठा बदल असा असेल कि, सामना सुरु होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
त्यांनतर तिसरा बदल म्हणजे आयपीएलचा उत्साह वाढवण्यासाठी चिअरलीडर असतात पण आजच्या सामन्यात त्यांचाही समावेश नसणार आहे आणि चौथा बदल या सामन्यात कोणत्याही प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी होणार नसल्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला.