
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना
ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल रोजी ‘जागतिक वसुंधरा दिन’ (Earth Day) साजरा केला जात असून ‘आमची ऊर्जा आमची वसुंधरा’ हे या वर्षीचे घोषवाक्य असले तरी वाढत पृथ्वीचे तापमान धोक्याची घंटा आहे. यामागे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे हे एक मुख्य कारण आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रेस ऑक्साईड यासारख्या वायूंमुळे उष्णतेचा अडथळा होतो आणि त्यामुळे तापमानात वाढ, वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या आपत्तीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई, ठाणे यांसारख्या शहरी भागात या वर्षी तापमान ४० अंशांपर्यंत गेले. ऋतूंचा ठरलेला क्रम ढासळत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) हिमनद्या वितळत आहेत, समुद्रसपाटी वाढते आहे आणि त्यामुळे किनारपट्टी भागांना धोका निर्माण झाला आहे. ओझोन थरही कमी होत आहे, जो पृथ्वीवर येणाऱ्या घातक किरणांपासून आपले रक्षण करतो. त्वचाविकार, डोळ्यांचे विकार हे याचे परिणाम आहेत.

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. साडेतीन ...
पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांच्या मते, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ३०० पीपीएम असावे, सध्या ते ५०० पीपीएमपेक्षा जास्त झाले आहे. हे वाढलेले प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार ठरत आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, ओझोन थर कमी होत आहे व त्वचा विकार, मोतीबिंदूसारखे आजार वाढत आहेत.
लक्झरी जीवनशैली पर्यावरणविरोधी बनत चालली आहे. फ्रिज, एसी, औषध फवारण्या, विमानप्रवास यातून क्लोरोफ्लोरोकार्बन वायू बाहेर पडतो, जो ओझोन थर नष्ट करतो. त्यामुळे पृथ्वीवर अधिक प्रमाणात यूव्ही किरणे पोहोचतात. शहरी भागांमध्ये माणसागणिक वाहने आहेत. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड यांसारखे वायू हवेत मिसळून उष्मा वाढवत आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा न केल्यामुळे मिथेनसारखा वायू निर्माण होतो.
ऊर्जेला फक्त उपभोगाचे साधन न मानता तिचा योग्य सन्मान करावा. हवा तेवढाच आणि आवश्यक असेल तेव्हाच वापर करावा. वृक्षसंख्या वाढली की आपसुकच ऊर्जेचा वापर कमी होईल. आमचे प्रेम पारंपरिक ऊर्जेवर जास्त असून, वृक्षांवर कमी आहे. मात्र याचा विपरीत परिणाम पृथ्वीवर होऊन तापमान वाढत आहे.
- डॉ. नागेश टेकाळे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ