डोंबिवली : पुण्यात झालेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गंभीर प्रकरणानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली आहे. अशातच डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाला मनसेकडून टाळे लावण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. रुग्णालयातील व्यवस्था आणि रुग्णांचे होणारे हाल या विरोधात मनसेने आवाज उठवला आहे. येथे रुग्णसुविधा कायमच अपुरी, गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला, रुग्णालयात औषध नसल्याचे सांगत रुग्णालयातील डॉक्टरांकडून समोरील मेडिकलमधून औषध घेण्यास सांगणे, रुग्णवाहिकेकरता पैसे घेणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप मनसेने यावेळी केला.
Avaada Company : आवादा कंपनीत चोरी करणाऱ्या टोळीचा वाल्मिक कराडशी संबंध ?
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात करदात्या गोरगरीब रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळत नाही. शास्त्रीनगर रुग्णालय फक्त शोभेचे झाले असून जास्तकरून गंभीर रुग्णाला ठाणे किंवा मुंबईत पाठविले जाते. या रुग्णालयात विविध शाखेसाठी तज्ञ डॉक्टर नाहीत. रुग्णालयात गंभीर परिस्थितीत ठेका पद्धतीने डॉक्टर बोलाविले जातात. काहीवेळा त्यांचीही उणीव जाणवते. असे रुग्णालय काय कामाचे त्यापेक्षा शहरभर फलक लावून आमच्या रुग्णालयात डॉक्टर नाहीत असा प्रसार करा म्हणजे कोणीही गंभीर आजाराचा रुग्ण येणार नाही प्रथमच तो इतर रुग्णालयात जावून आपला जीव वाचवेल असा रोखठोक सवाल मनसेने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांना विचारून पुढे बदल झाला नाही तर रुग्णालयाला टाळे ठोकू असा गंभीर इशारा दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि ठाणे जिल्हा संघटक तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून रुग्णालयातील कारभाराविषयी जाब विचारला. येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत हे रुग्णालय फक्त गर्भवती महिलांसाठीच आहे का असा प्रतिप्रश्न केला. कोणत्याही प्रकारच्या रूग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत असे ठणकावून सांगितले. तसेच रुग्णालयात एका डॉक्टराने पुढील पाच दिवस म्हणजे २० एप्रिल पर्यंत हजेरी रजिस्टरवर सह्या केल्याचे दिसल्यावर मनसेने जाब विचारला. आधीच डॉक्टरांची कमतरता त्यात कामावर हजर असल्याचे दाखविणे असे प्रकार सुरु असल्याचा मनसेने आरोप केला. दरम्यान मनसेच्या या हल्लाबोलनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील व्यवस्था बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.