Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Piyush Goyal : 'वर्षभरात उत्तर मुंबईतील एक लाख युवकांना देणार नोकऱ्या'

Piyush Goyal : 'वर्षभरात उत्तर मुंबईतील एक लाख युवकांना देणार नोकऱ्या'
मुंबई : वर्षभरात उत्तर मुंबईतील एक लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार कोणताही तरुण किंवा महिला बेरोजगार राहणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कांदिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात दिली.



आमदार योगेश सागर यांनी महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाच्या सहकार्याने भुराभाई मैदानावर आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यात तीन हजारहून अधिक उमेदवारांनी नोंदणी करून प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे ६० कंपन्या आणि ६ महामंडळांनी जागेवरच रोजगार उपलब्ध करून देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मेळाव्यात एक हजारहून अधिक उमेदवारांनी नोकऱ्या मिळवत आयोजकांचे आभार मानले. या रोजगार मेळाव्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे, दरवर्षी तरुणांचा प्रतिसाद वाढत आहे.



'आजच्या तरुणांचा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून माझी छाती ५६ इंच अभिमानाने फुलली आहे. ही ऊर्जाच नवीन भारताची खरी ताकद आहे, असे म्हणत पीयूष गोयल यांनी आता दरमहा कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्रात रोजगार मेळावे आयोजित केले जातील आणि लवकरच ठाकूर कॉम्प्लेक्समध्येही तिसरे कौशल्य विकास केंद्र सुरू केले जाईल, अशी घोषणा केली.



'अलिकडेच व्हायरल झालेल्या स्टार्टअप महाकुंभातील पीयूष गोयल यांच्या भाषणाने मी खूप प्रेरित झालो. त्यांच्या संदेशामुळे मला मोठे स्वप्न पाहण्यास आणि उद्योजकता जोपासण्यास प्रोत्साहन मिळाले', असे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले. यावेळी गोयल यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याबाबत बोलताना विरोधकांवर कडाडून टीका केली. काँग्रेस दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरली. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद पूर्णपणे उखडून टाकला जाईल, असे गोयल यांनी सांगितले. या रोजगार मेळाव्याला आमदार योगेश सागर, भाजप नेते विनोद शेलार, गणेश खणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Add Comment