Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai : मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आयुक्त घेणार दैनंदिन आढावा

Mumbai : मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आयुक्त घेणार दैनंदिन आढावा

आतापर्यंत मुंबईत ७ टक्के एवढी सफाई

मुंबई (खास प्रतिनिधी) : नालेस्वच्छतेच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवा. गाळ काढण्यावर भर देत असतानाच भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी उपाययोजना आखा. मुंबई महानगरातील प्रत्येक लहान-मोठा नाला तसेच मिठी नदींतील कामांचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक अभियंत्याने आपाल्याकडे सुरू असलेल्या कामाचे नियोजन करावे. कामांचा टप्पा, त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि हातात असलेला कालावधी या त्रिसूत्रीचा वापर करून पुढील कामांचे नियोजन करा, अशा महत्त्वाच्या सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी गगराणी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत ७ टक्के एवढे नालेसफाईचे काम पूर्ण झाली आहे.

मुंबईतील विहीर मालकांना  महानगरपालिकेकडून बजावण्यात आलेल्या सूचनापत्रांना  १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती

मुंबईतील पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार ११ एप्रिल २०२५ रोजी महत्त्वाची बैठक पार पडली. तेव्हा गगराणी बोलत होते. या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

विविध प्राधिकरणांशी समन्वय राखा

पावसाळ्यात विविध प्राधिकरणांशी सातत्याने परस्पर समन्वय ठेवून दररोजच्या कामांबाबत माहिती जाणून घ्या. जेणेकरून दुर्दैवाने कुठे पाणी तुंबले तर महानगरपालिकेच्या यंत्रणेसह या प्राधिकरणांचीही मदत घेवून जनजीवन सुरळीत करता येईल. हवामानाच्या अंदाजानुसार ज्या-ज्या वेळी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात येईल त्या-त्या वेळी प्रत्येक अधिकारी कार्यस्थळी हजर रहायला हवा, अशा सूचनाही गगराणी यांनी केल्या आहेत

कार्यालयीन कामे सांभाळून नालेसफाईच्या कामांना भेटी द्या

आपल्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती प्रत्येक अधिकाऱ्याला असायलाच हवी. त्या कामाची सद्यस्थिती, त्या ठिकाणचे आव्हाने, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर तोडगा काढा. कार्यालयीन कामे सांभाळून प्रत्येक अभियंत्याने प्रत्यक्ष नालेसफाई सुरू असलेल्या ठिकाणी दररोज भेट द्यायला हवी,अशीही सूचना त्यांनी केली.

कचरा कसा साचतो याचे निरीक्षण करा

मोठ्या नाल्यांमधून गाळ काढताना कामाचे आणि अंतराचे टप्पे ठरवून नियोजन करा. ज्या नाल्यांमध्ये तरंगणारा घरगुती घनकचरा मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने साचतो, अशा नाल्यांची १५ मे २०२५ नंतर पुन्हा पुन्हा स्वच्छता करा. तसेच कोणत्या नाल्यांमध्ये कोणत्या ठिकाणी आणि कशामुळे कचरा साचतो याचे निरीक्षण करून त्यानुसार उपाययोजना आखा. नालेनिहाय पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणाच्या १०० मीटरच्या त्रिज्येमध्ये जे लहान, मोठे नाले आहेत ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत आहेत की नाही, याचीही पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करावे.

तर कंत्राटदारांवर होणार कारवाई

प्रत्येक पंपासाठी सूक्ष्म नियोजन करून त्या ठिकाणी महानगरपालिकेचा कर्मचारी तैनात करा. तसेच काही मोबाईल पंप हाताशी ठेवा. एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाला, तर त्याठिकाणी मोबाईल पंपाद्वारे पाणीउपसा सुरू ठेवता येईल. पंपामध्ये सातत्याने बिघाड झाला तर पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गगराणी यांनी दिला आहे.

मुंबईत एक एप्रिल पासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत लहान मोठे तसेच मिठी नदीची अशाप्रकारे मिळून ७ टक्के एवढीच सफाई झालेली आहे. यासर्व ठिकाणांहून ९ लाख २७ हजार ३५४ मेटीक टन एवढा गाळ काढला जाणार असून त्यातील आतापर्यंत ६५ हजार ५१४ मेटीक टन एवढा गाळ काढण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -