Monday, August 25, 2025

मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दल तैनात; ३ मृत्यू, १२० हून अधिक अटक

मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दल तैनात; ३ मृत्यू, १२० हून अधिक अटक

कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल : वक्फ (सुधारणा) कायद्याविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून १२० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये एक पिता-पुत्र देखील आहे, ज्यांची हत्या त्यांच्या घरी चाकूने वार करून करण्यात आली. घरात लूट देखील झाल्याची माहिती मृतांच्या नातेवाइकांनी दिली आहे.

हिंसाचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कलकत्ता उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला असून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अति-संवेदनशील भागांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची पथके तात्काळ तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती राजा बसू चौधुरी यांच्या खंडपीठाने दिला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी ही मागणी न्यायालयात केली होती.

जाफराबाद आणि सजूरमोर परिसरात मोठ्या प्रमाणावर हल्ले

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज व सुती भागांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. जाफराबाद आणि सजूरमोर परिसरात मोठ्या प्रमाणावर हल्ले, तोडफोड, आगजनी आणि दुकानांमध्ये लूट झाली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केल्यानंतरही जमाव हटला नाही, त्यामुळे चार गोळ्या झाडल्या गेल्या, अशी माहिती ADG (लॉ & ऑर्डर) जावेद शमीम यांनी दिली.

हिंसाचारात १३ पोलीस कर्मचारी आणि २ नागरिक जखमी झाले असून, एक युवक गोळी लागून मरण पावला आहे.

BSF तैनात, इंटरनेट सेवा बंद, कर्फ्यू लागू

परिस्थिती हाताळण्यासाठी बांग्लादेश सीमेला लागून असलेल्या भागात BSF ची तैनाती करण्यात आली आहे. धारा १६३ अंतर्गत कर्फ्यू लागू करण्यात आला असून, इंटरनेट सेवा बंद केली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत सांगितले की, "धर्माच्या नावाखाली अधार्मिक कृती करू नका, समाजात फुट पाडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होईल." त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं की राज्य सरकार वक्फ (सुधारणा) कायद्याला पाठिंबा देत नाही आणि तो बंगालमध्ये लागू होणार नाही.

भाजपचा सरकारवर हल्लाबोल

विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी न्यायालयाचा आदेश 'लोकशक्तीचा विजय' असल्याचे म्हटले आणि राज्य सरकारवर आरोप करत म्हणाले की, “BSF तैनात असतानाही जिल्हाधिकारी गप्प का बसला?”

पोलीस महासंचालकांचा इशारा

DGP राजीव कुमार यांनी सांगितले की, हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.

Comments
Add Comment