वृषाली आठल्ये : मुंबई ग्राहक पंचायत
७५ वर्षांच्या एका निवृत्त कर्नल यांना एका सायबर गुन्हेगारांनी तीन कोटी रुपयाला फसवल्याची एक बातमी नुकतीच वाचनात आली. त्या लोकांनी त्यांना कमी पैशात जास्तीचे पैसे कमवायचे आमिष दाखवून फसवले. प्रथम त्यांना काही पैसे मिळाल्याचे दिसले, त्यामुळे कर्नलनी आणखी पैसे गुंतवले. जवळजवळ आयुष्यभराची कमाई म्हणा ना! खात्यावर फायदा दिसत असूनही तो काढता येत नव्हता शिवाय गुंतवलेली मुद्दलही गेली. अशा बातम्या आजकाल आपण नेहमीच वाचतो. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या गुन्हेगारांचे सोप्पे सावज हे ज्येष्ठ नागरिक असतात.
आजकाल आपण ऑनलाइन खरेदी, तसेच बँकेचे व्यवहार सगळंच ऑनलाइन करतो तसेच आपण सोशल मीडिया पण सतत वापरत असतो. प्रत्येक गोष्टीचे जसे चांगले परिणाम असतात, तसे वाईटही परिणाम असतात. ते म्हणजे सायबर गुन्हेगारी! या फसव्या लोकांनी नवीन नवीन युक्त्या शोधल्या आहेत. त्या वापरून विविध प्रकारांनी ते ग्राहकांना फसवत असतात. बहुतेकदा यामध्ये अडकणारे ज्येष्ठ नागरिक असतात. २०२४ मध्ये मुंबई येथील सगळ्यात मोठा सायबर गुन्हा एका ज्येष्ठ नागरिकांबरोबर झाला. त्या माणसांनी कमी पैसे गुंतवून दुपट्ट पैसे मिळतील, म्हणून वेगवेगळ्या खात्यात पैसे टाकून शेअर मार्केटमध्ये गुंतवले पण त्यांना दुप्पट पैसे तर सोडाच पण त्यांनी गुंतविलेले पैसे देखील परत आले नाहीत. त्यांचे एकूण ११ कोटी रुपये गेले. दर महिन्याला आपण आपली विजेची बिले ऑनलाइन भरतो किंवा NACH ने आपल्या खात्यातून कट करायला सांगतो. पण रात्री किंवा संध्याकाळी कॉल येतो की आताच्या आता विजेचे बिल भरा. आज शेवटचा दिवस आहे, यटा नंबर वर पैसे पाठवा नाहीतर वीज कापली जाईल. आपण घाबरून जातो आणि पैसे भरतो आणि नंतर बँकेचे पासबुक तपासल्यानंतर लक्षात येत की, आपले बिल भरलेले होते. यासाठीच बँकेतील व्यवहारांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज असते. दुसरा प्रकार म्हणजे अनोळखी नंबरवरून कॉल येतो तुमच्या नातेवाइकाचा अपघात झाला आहे. ते हॉस्पिटलमध्ये आहेत. अमुक एका नंबरवर पैसे पाठवा. आपलाच नातेवाईक, हॉस्पिटल ऐकले की आपण घाबरतो आणि समोरच्यावर विश्वास ठेऊन पैसे पाठवतो. ती बातमी खरी आहे किंवा नाही याची खातरजमा करत नाही.
हल्लीच एक फसवण्याचा भयानक प्रकार आला आहे. डिजिटल अटक! एक घटना अशी घडली. मुंबईतील एका महिलेला एक कॉल आला की, तिच्या नावाने एक पार्सल तैवानला पाठवण्यात आले आहे आणि त्यात ड्रग्स आणि इतर काही महागडे सामान आहे. एवढेच नाही तर तिची केस एका पोलीस अधिकाऱ्याकडे दिली आहे. तिला डिजिटल अटक केली गेली आहे. सुरुवातीला तिला पंधरा लाख रुपये पाठवायला सांगितले, जेणेकरून ते तिचं बँक अकाऊंट व्हेरिफाय करू शकतील आणि थोड्या वेळाने तिला तिचे पैसे परत करून तिचा विश्वास मिळवला. त्यानंतर तिला परत वेगळ्या अकाऊंटमध्ये परत पैसे टाकायला सांगितले. असा करता करता त्या बाईने स्वतःच्याच नाही तर तिच्या नवऱ्याच्या अकाऊंटमधूनही तब्बल ३.८ कोटी रुपये ६ वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले. हे सगळं चालू असताना तिला भीतीही घातली गेली की, आमच्या अटकेत असल्याने कोणालाही काही सांगायचे नाही. आम्ही तुझ्यावर लक्ष ठेऊन आहोत. जेव्हा तिचे पैसे परत आले नाहीत तेव्हा मात्र तिला संशय आला आणि तिने आपल्या मुलीला सगळी हकीकत सांगितली. सगळं ऐकताच तिच्या मुलीने ती फसवली गेल्याचे सांगितले आणि त्यामुळे पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.
आधी म्हटल्याप्रमाणे फसवाफसवीच्या प्रकरणात जास्त करून ज्येष्ठ नागरिक अडकतात. त्याची कारणे अनेक आहेत. उतारवयात त्यांच्या हातात कॉम्प्युटर किंवा स्मार्ट फोन आले आहेत. जुजबी ज्ञानावर ते यावर काम करत असतात. त्याना तांत्रिक गोष्टींची माहिती नसते, तसेच त्यांना या वयात तंत्रज्ञान शिकणं अवघड जात. दुसरं कारण म्हणजे हे लोक एकटे असल्यामुळे कोणीही त्यांच्याशी थोडे जरी गोड बोलले किंवा मदत देऊ केली की ज्येष्ठ नागरिक त्यांना आपली सगळी गोपनीय माहिती सहजपणे देऊन टाकतात. शिवाय वयोमानानुसार होणारे विस्मरण याचाही फायदा लोक घेतात. हे नवीन नवीन फसवणुकीचे प्रकार माहीत नसल्यामुळे ते अनोळखी इमेल्स, वेबसाईट किंवा कॉल ओळखू शकत नाहीत. फसवणारे लोक हे ज्येष्ठांना अनेक खोट्यानाट्या गोष्टी सांगून पैसे घेतात.
हा विषय इतका मोठा आहे की, सांगू तितके कमी आहे पण ग्राहकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
१) आपल्या मोबाईलला कठीण पासवर्ड ठेवा जो कोणी शोधू शकणार नाही.
२) ‘https’ अशा संकेत स्थळावरूनच व्यवहार करा. यातील शेवटचा ‘s’ ती वेबसाईट सुरक्षित असल्याचे दर्शवतो.
३) कुठलीही साईट वापरून झाल्यावर आठवणीने लॉग आऊट करा.
४) बँक खाते, ATM / क्रेडिट कार्ड इत्यादीचा पासवर्ड कोणालाही देऊ नये. अगदी बँकेतून बोलतोय असे सांगितले तरी. कारण लक्षात ठेवा की बँक कधीही कॉल करून पासवर्ड विचारात नाही.
५) कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. भीती आणि मोह यापासून दूर राहा.
६) तिऱ्हाईत माणसाला सोशल मीडियावर आपले लोकेशन पाठवू नका.
काळजी घेऊनही फसवले गेल्यास १९३० या हेल्पलाईनवर किंवा सायबर सेलच्या वेबसाइटवर https://cybercrime.gov.in वर आपली तक्रार नोंदवा.