काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल, भडकावणाऱ्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल
बंगळुरू / दावणगेरे : वक्फ (दुरुस्ती) कायद्यावरून (Waqf Amendment Bill 2025) देशभरात सुरू असलेल्या वादात आता आणखी एक खळबळजनक वळण आले आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे माजी नगरसेवक कबीर खान यांनी आंदोलनकर्त्यांना “प्रत्येक शहरातून ८-१० लोक मरायला हवेत. ५०-१०० गुन्हे दाखल व्हायला हवेत. बस-ट्रेन जाळा” अशा स्वरूपाचे आक्षेपार्ह आणि भडकावू वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन मिनिटांच्या व्हिडिओत कबीर खान यांनी वक्फ कायद्याच्या विरोधातील निषेध अधिक उग्र करण्याचे आवाहन करताना, पोस्टर धरून आणि निवेदन देऊन काही होणार नाही, असे म्हणत आंदोलनकर्त्यांना हिंसक मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. कबीर खान तरुणांना रस्त्यावर येण्याचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे आणि कायद्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी प्राणांचे बलिदान देण्याचे आवाहन करताना दिसत आहे. बस, ट्रेन जाळा. या गोष्टी फक्त बोलून होत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याग, बलिदान द्यावे लागेल, असे कबीर खान यांनी म्हटले आहे.
“रस्त्यावर उतरा, प्राणांचे बलिदान द्या, जाळा, मरा, प्रत्येक गावातून ८-१० लोक मरायला हवेत… एवढ्या सोप्या पद्धतीने हे बिल मागे घेतलं जाणार नाही,”
— कबीर खान, काँग्रेसचे माजी नगरसेवक
कायदा आणि सुव्यवस्थेला धोका
या वक्तव्यानंतर दावणगेरे पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेला हा व्हिडिओ ८ एप्रिल रोजी अज्ञात ठिकाणी रेकॉर्ड करण्यात आला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर कबीर खान फरार असून, त्याचा मोबाईल बंद आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
जातीपातींचे राजकारण करुन सामाजिक विभाजनाचा काँग्रेसचा छुपा अजेंडा – संजय निरुपम
विरोध आणि टीकेची लाट
या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वर्तुळात काँग्रेसवरही टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला काँग्रेस वक्फ कायद्यातील बदलांवर मौन बाळगत असल्याचा आरोप होत असतानाच, दुसऱ्या बाजूला तिच्या माजी पदाधिकाऱ्याचे असे विधान समोर येणे पक्षाच्या अडचणी वाढवणारे ठरत आहे.
पश्चिम बंगालनंतर कर्नाटकमध्येही अस्वस्थता
अलीकडेच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलन उसळले होते. आता कर्नाटकमध्ये अशा प्रकारचे भडक वक्तव्य समोर येणे देशभरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक मानले जात आहे.