सोलापूर : सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत, यासाठी मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केले, मात्र काहींनी बंगल्यात राहून ‘एफबी’वर सरकार चालवले. घरात बसून ‘फुकट बाबुराव’प्रमाणे सरकार चालत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठावर केली. सांगोला विद्या मंदिर प्रशाळेच्या मैदानात आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच महाआरोग्य शिबीरास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सांगोल्याच्या जनतेच्या ह्रदयात आजही शहाजी बापूच आहेत. सांगोल्यातील नेते साधे आहेत, पण काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा असं आहे, चेहऱ्यावर जाऊ नका कारण आपणही इतके वर्ष चेहऱ्यामुळे फसलो, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मागील अडीच वर्षात सांगोला मतदार संघात ५५०० कोटींचा निधी दिला. आजवरच्या इतिहासात इतका निधी कोणीच दिला नव्हता. एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही तर पुढल्या मॅचमध्ये दुप्पट तुटून पडते आणि चॅम्पियन्स ट्रॉफी घरी येते. शहाजी बापू लढवय्ये आहेत. शिवसेनेत जेव्हा उठाव झाला तेव्हा बापू पहिल्या दिवसापासून पहाडासारखे उभे होते. सांगोला दुष्काळमुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, महायुती सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळ कमी करण्यासाठी सिंचन वाढवण्याचा प्रयत्न केले. अडीच वर्षात सरकारने १५० सुप्रमा दिल्या. नुकताच मंत्रिमंडळाने म्हैसाळ उपसासिंचन प्रकल्पासाठी सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी १५०० कोटी मंजूर केले. सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासाठी ८८३.७८ कोटी मंजूर केले. या तालुक्यात सर्वच समाजाच्या कल्याणासाठी बापूंनी कामे केली आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खुर्च्या बदलल्या तरी मनं बदललेली नाहीत आणि संकल्पसुद्धा बदलले नाहीत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आणखी वेगाने राज्याचा विकास करणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!
बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचे काम आपण करत आहोत, असे ते म्हणाले. जगदगुरु तुकाराम महाराज पुरस्कार, महापराक्रमी महादजी शिंदे पुरस्कार, इंडियन एक्सप्रेसकडून देशातील १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करुन केलेला सन्मान हे सर्व पुरस्कार मुख्यमंत्री नसताना मिळालेले असून त्याचे श्रेय जनतेचे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आज येथे लोकार्पण झाले. इंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक साकारले जात आहे. बाबासाहेबांच्या जिथे जिथे पाऊलखुणा आहेत, त्यांच्या आठवणी जिवंत करण्याचे काम महायुती सरकारने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले होते. मात्र बाबासाहेबांच्या विचारांनी आपले सरकार चालत आहे. या राज्यातील गरिब, शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.