Ashwini Bidre Murder Case : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेच्या आरोपीला २१ एप्रिलला मिळणार शिक्षा

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणात पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलं आहे. लिव-इन पार्टनर अश्विनी बिद्रेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे करणे आणि त्यांची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करणे असे आरोप कुरुंदकरवर होते. न्यायालयाने कुरुंदकर आणि त्याच्या दोन साथीदारांना दोषी ठरवले आहे. दोषींच्या शिक्षेचा निर्णय न्यायालय २१ एप्रिल रोजी जाहीर करणार आहे. पनवेल सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.



काय आहे नेमकं प्रकरण ?


अभय कुरुंदकर हे मुंबई पोलिसांच्या ताफ्यातील नावाजलेलं नाव होत. त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालं होतं. कुरुंदकर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अश्विनी बिद्रेच्या प्रेमात पडले. पण २००५ साली अश्विनी बिद्रेचं लग्न राजू गोरे नावाच्या व्यक्तीशी झालं. लग्नाच्या दोन वर्षांनी तिने महाराष्ट्र पीएससी उत्तीर्ण केली आणि पोलिसात सब-इन्स्पेक्टर झाली. तिचं पहिलं पोस्टिंग पुण्यात झालं. तीन वर्षांनंतर, अश्विनीची सांगलीला बदली झाली.


अश्विनीची हत्या झाली तेव्हा तिची मुलगी अवघ्या ६ वर्षांची होती. अश्विनीची पोस्टिंग रत्नागिरी येथे २०१३ मध्ये झाली. कुरुंदकरचे लग्न झालेले असूनसुद्धा तो अश्विनीसोबत लिव-इन पार्टनर म्हणून राहत होता. दोघांच्याही घरी याची कल्पना होती. अश्विनी २०१४ मध्ये तिच्या पतीपासून वेगळी झाली. मात्र अभयच्या घरी या घडामोडीची माहिती नव्हती.



अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. अश्विनीला २०१५ मध्ये बढती मिळाली आणि ती सहाय्यक पोलिस निरीक्षक बनली. बढती झाल्यानंतर ती ११ एप्रिल २०१६ रोजी बेपत्ता झाली. अश्विनीच्या भावाला आनंदला १५ एप्रिल रोजी फोनवर मेसेज आला की ती काही कामासाठी उत्तर प्रदेशला जात आहे आणि एका आठवड्यानंतर परत येईल. मेसेज आल्यामुळे अश्विनीच्या घरचे निवांत होते. मात्र एक दिवस अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलिस मुख्यालयातून मोबाईलवर फोन आला आणि त्यांच्याकडे अश्विनीबद्दल चौकशी करण्यात आली.


अश्विनी दोन महिन्यांपासून कामावर आली नाही, असे त्यांना सांगण्यात आलं. पण कोल्हापुरात राहणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती नव्हते. यानंतर अश्विनीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना अभय आणि अश्विनी यांच्या नात्याबद्दल स्पष्टता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अभयची चौकशी केली पण त्यांना काहीच सापडले नाही. काही दिवसांनी तपासादरम्यान पोलिसांना अश्विनीच्या लॅपटॉपमधून काही पुरावे सापडले ज्यावरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांना लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओही सापडला ज्यामध्ये अभय अश्विनीला मारहाण करताना दिसला होता. तब्बल १० महिन्यांच्या तपासानंतर अभयने शरणागती पत्करली आणि अश्विनीचा खून केल्याची कबुली दिली.


अश्विनी आपल्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे अभयने पोलिसांना सांगितलं. पण आपली इमेज जपण्यासाठी अभय हा त्याची पत्नी आणि मुलांना सोडण्यास तयार नव्हता. याच मुद्यावरून झालेल्या भांडणादरम्यान अभयने अश्विनीचा खून केला. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले असल्याचं कबुल केलं. या घटनेनंतर अश्विनीच्या कुटुंबाने आणि तिच्या मुलीने आईला न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. तब्बल ९ वर्षांनी न्यायालयीन लढाईत त्यांना यश मिळालं आहे. अश्विनीच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना पनवेल न्यायालयाने दोषी ठरवले आहे.



न्यायालयात आतापर्यंत काय घडले ?


हत्येत पीआय अभय कुरुंदकर यांचा सहभाग असल्याचं समोर आलं. पनवेल सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान, अभय कुरुंदकर हेच दोषी असल्याचं आढळून आल्याने न्यायालयाने अभय कुरुंदकर यांना मुख्य दोषी ठरवलं. तसेच हत्येत सहभागी असलेल्या महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांनाही न्यायालयाने दोषी ठरवलंय. तर कुरुंदकर यांचा वाहनचालक राजेश पाटीलला मात्र न्यायालयाने दिलासा दिला असून पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता केलीयं.
Comments
Add Comment

गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि

प्रशासनात खांदेपालट, ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व

राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून 'दादांच्या' अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन...

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

BMC Election 2026: भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार

मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई