बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचे लग्न ऋतुजा पाटील सोबत होत आहे. जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरू केली आहे तर ऋतुजा पाटील या सोशल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनरची मुलगी आहेत. ऋतुजा पाटीलचे वडील म्हणजे फलटणचे प्रवीण पाटील. प्रवीण पाटील हे राजकारणी, व्यावसायिक, सेलिब्रेटी आदींसाठी सोशल मीडिया स्ट्रॅटेजी तयार करणारी कंपनी चालवतात. ही कंपनी नाविन्यपूर्ण स्ट्रॅटेजी राबवून क्लाएंटची सोशल मीडिया इमेज तयार करते आणि जपते. तसेच ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांची सून आहे.
अमृत महोत्सवी – शतक महोत्सवी सोहळा हा दिमाखदार साजरा व्हावा…!
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्न डिसेंबर २०२५ मध्ये होणार आहे, साखरपुडा आज म्हणजे गुरुवार १० एप्रिल रोजी होत आहे. अजित पवारांच्या घोटावड्याच्या फार्महाऊसवर संध्याकाळी साडेपाच वाजता साखरपुडा होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व मतभेद विसरुन अजित पवारांनी सर्व पवार कुटुंबियांना आमंत्रण दिले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य साखरपुड्याला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. साखरपुड्याला मी, सदानंद सुळे आणि रेवती जाणार आहोत, असे शरद पवार गटाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले आहे.
याआधी राजकीय मुद्यावरुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाले. शरद पवार पुढील पिढीला संधी देत नाहीत, सर्व निर्णय ठराविक नेतेच घेतात, पक्षात लोकशाही उरलेली नाही; अशा स्वरुपाच्या तक्रारी करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. पुढे बहुसंख्य आमदार आणि खासदार यांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला. नंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या नेतृत्वात कार्यरत आहे तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे जाहीर केले. शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाला नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे स्वतंत्र नाव देण्यात आले. या राजकीय घडामोडींमुळे पवार कुटुंबात मतभेद सुरू झाल्याची चर्चा जोर धरू लागली. यानंतर आता जय पवारांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने मतभेद विसरुन पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच अनेकांचे लक्ष साखरपुड्याकडे आहे.