नवकार महामंत्र दिवसानिमित्त पंतप्रधानांनी मांडले 9 संकल्प
नवी दिल्ली: भारताचे प्रयत्न आणि त्याचे परिणाम प्रेरणास्थान बनत असल्याने जगाचा भारतावरील विश्वास वाढत असून जागतिक संस्था आता भारताकडे पाहत आहेत. भारताची प्रगती इतरांसाठी मार्गदर्शक होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन केले आणि त्यात सहभागी झाले.
“परस्परोपग्रहो जीवनम्” या जैन तत्वज्ञानावर भर देऊन जीवन परस्पर सहकार्यावर भरभराटीला येते, असे त्यांनी नमूद केले. याच दृष्टिकोनामुळे भारताकडून जागतिक अपेक्षाही वाढल्या असून देशाने आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत, असे त्यांनी नमुद केले. हवामान बदलाच्या महत्त्वाच्या मुद्द्याला संबोधित करताना, त्यांनी शाश्वत जीवनशैली हा उपाय ठरवून भारताच्या मिशन लाईफच्या प्रारंभावर प्रकाश टाकला. जैन समुदाय शतकानुशतके साधेपणा, संयम आणि शाश्वततेच्या तत्त्वांचे पालन करत आहे. अपरिग्रह या जैन तत्वाचा संदर्भ देत, त्यांनी या मूल्यांचा व्यापक प्रसार करण्याची गरज आहे, यावर भर दिला. प्रत्येकाने मिशन लाईफचे ध्वजवाहक बनण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवकार मंत्राचा गूढ आध्यात्मिक अनुभव अधोरेखित केला तसेच मनामध्ये शांती आणि स्थैर्य आणण्याच्या त्याच्या क्षमतेवर भर दिला. शब्द आणि विचारांच्या पलीकडे जाणारी, मन आणि चेतनेत खोलवर प्रतिध्वनित होणारी शांतीची असाधारण भावना त्यांनी विशद केली. नवकार मंत्राचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी यांनी त्यातील काही पवित्र श्लोक ऐकवले आणि हा मंत्र उर्जेचा एकीकृत प्रवाह असल्याचे सांगितले , जो स्थैर्य , समता आणि चेतना आणि आंतरिक प्रकाशाच्या सामंजस्यपूर्ण लयीचे प्रतीक आहे. आपले वैयक्तिक अनुभव कथन करताना , त्यांनी आपल्या अंतर्मनात नवकार मंत्राची आध्यात्मिक शक्ती कशी जाणवत आहे याबद्दल सांगितले. काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक जप कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली जिने त्यांच्यावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. पंतप्रधानांनी देशभरातील आणि परदेशातील लाखो सद्गुणी आत्म्यांचे एकात्मिक चेतनेत एकत्र येणे हा अतुलनीय अनुभव असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सामूहिक ऊर्जा आणि समन्वित शब्दांबाबत बोलताना ते खरोखरच असाधारण आणि अभूतपूर्व असल्याचे नमूद केले.
“नवकार मंत्र पठण करताना 108 दैवी गुणांपुढे आपण नतमस्तक होतो आणि मानवतेच्या कल्याणाचे स्मरण करतो “, असे सांगून मोदी म्हणाले की, हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो की ज्ञान आणि कर्म हेच जीवनाची दिशा आहेत, गुरु हे मार्गदर्शक प्रकाश आहेत आणि मार्ग तोच आहे जो आतून निघतो. त्यांनी नवकार मंत्राच्या शिकवणींबाबत अधिक माहिती दिली जी स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःचा प्रवास सुरु करण्यास प्रेरणा देतात. त्यांनी सांगितले की खरा शत्रू आपल्या आतच आहे – नकारात्मक विचार, अविश्वास, शत्रुत्व आणि स्वार्थ – आणि त्यांच्यावर विजय मिळवणे हाच खरा विजय आहे. त्यांनी अधोरेखित केले की जैन धर्म, व्यक्तींना बाह्य जगापेक्षा स्वतःवर विजय मिळविण्यासाठी प्रेरित करतो. “स्वतःवर मिळवलेला विजय आपल्यला अरिहंत बनवतो “, असे सांगून ते पुढे म्हणाले की नवकार मंत्र ही मागणी नसून एक मार्ग आहे – असा मार्ग जो व्यक्तींना आतून शुद्ध करतो आणि त्यांना सौहार्द आणि सद्भावनेचा मार्ग दाखवतो.
“नवकार मंत्र हा खऱ्या अर्थाने मानव ध्यान, साधना आणि आत्मशुद्धीचा मंत्र आहे”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. त्यांनी त्याचा जागतिक दृष्टिकोन आणि त्याचे कालातीत स्वरूप अधोरेखित केले, जो इतर भारतीय श्रुति–स्मृति परंपरांप्रमाणेच पिढ्यानपिढ्या चालत आला आहे – आधी मौखिक, नंतर शिलालेखांद्वारे आणि शेवटी प्राकृत हस्तलिखितांद्वारे – आजही मानवतेला मार्गदर्शन करत आहे. “पंच परमेष्ठींच्या आराधनेसह , नवकार मंत्र योग्य ज्ञान, योग्य समज आणि योग्य आचरणाचे प्रतीक आहे, जो मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे “, असे त्यांनी अधोरेखित केले.
पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या जीवनातील नऊ तत्वांचे महत्त्व अधोरेखित करताना, मोदी यांनी भारतीय संस्कृतीत नऊ क्रमांकाचे विशेष महत्त्व नमूद केले. त्यांनी जैन धर्मातील नऊ क्रमांकाच्या महत्त्वाबद्दल सविस्तर माहिती देताना नवकार मंत्र, नऊ तत्वे आणि नऊ गुणांचा उल्लेख केला, तसेच नऊ निधी , नवद्वार, नवग्रह , दुर्गेची नऊ रूपे आणि नवधा भक्ती यासारख्या इतर परंपरांमध्ये त्याचे अस्तित्व स्पष्ट केले. त्यांनी अधोरेखित केले की मंत्रांची पुनरावृत्ती – मग ती नऊ वेळा असो किंवा नऊच्या पटीत असो जसे की 27, 54, 108 – ही संख्या नऊ द्वारे दर्शविल्या जाणाऱ्या पूर्णतेचे प्रतीक आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की नऊ ही संख्या केवळ गणित नाही तर एक तत्वज्ञान आहे, कारण ती पूर्णतेचे प्रतिनिधित्व करते. पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर, मन आणि बुद्धी स्थिर होते आणि नवीन गोष्टींच्या इच्छेपासून मुक्त होते. प्रगतीनंतरही, व्यक्ती त्यांच्या मुळापासून दूर जात नाही आणि हेच नवकार मंत्राचे सार आहे, असे त्यांनी सांगितले.
युद्ध, दहशतवाद आणि पर्यावरणीय समस्यांसारख्या जागतिक आव्हानांवर त्याच्या मुख्य तत्त्वांद्वारे उपाय देतो, म्हणून जैन धर्म वैज्ञानिक आणि संवेदनशील आहे, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “परस्परोपग्रहो जीवनम्” हे सर्व सजीवांच्या परस्परावलंबनावर भर देणारे जैन परंपरेचे प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जैन धर्माची अहिंसेप्रती वचनबद्धता, अगदी सूक्ष्म पातळीवरही पर्यावरण संवर्धन, परस्पर सौहार्द आणि शांतीचा एक सखोल संदेश म्हणून त्यांनी अधोरेखित केले. जैन धर्माच्या पाच प्रमुख तत्त्वांना कृतज्ञता देत त्यांनी आजच्या युगात अनेकांतवादाच्या तत्वज्ञानाच्या प्रासंगिकतेवर भर दिला. अनेकांतवादावरील विश्वास युद्ध आणि संघर्षाच्या परिस्थितींना प्रतिबंधित करतो, ज्यामुळे इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेण्यास प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले. जगाने अनेकांतवादाचे तत्वज्ञान स्वीकारण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
आजच्या माहितीच्या जगात ज्ञान मुबलक आहे, परंतु विवेकाशिवाय त्यात गंभीरता नाही. जैन धर्म योग्य मार्ग शोधण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानाचे संतुलन शिकवतो यावर त्यांनी भर दिला. तरुणांसाठी त्यांनी या संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले, मानवी स्पर्श हा तंत्रज्ञानाला पूरक असला पाहिजे आणि कौशल्यांना मनाची साथ असली पाहिजे यावर भर देत नवकार महामंत्र नवीन पिढीसाठी ज्ञान आणि दिशानिर्देशाचा स्रोत म्हणून काम करू शकतो, असे नमुद केले.
नवकार मंत्राच्या सामूहिक जपानंतर मोदींनी सर्वांना नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले. पहिला संकल्प ‘जलसंवर्धनाचा. पाणी दुकानांमध्ये विकले जाईल या १०० वर्षांपूर्वी बुद्धी सागर महाराज यांनी केलेल्या भाकिताची आणि यांच्या शब्दांची मोदी यांनी आठवण काढत, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य आणि जतन करण्याची गरज यावर भर दिला. दुसरा संकल्प म्हणजे ‘आईच्या नावाने एक झाड लावा’. त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांत १०० कोटींहून अधिक झाडे लावल्याचे अधोरेखित केले आणि सर्वांना त्यांच्या आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आणि तिच्या आशीर्वादांसारखे त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. गुजरातमध्ये 24 तीर्थंकरांशी संबंधित 24 झाडे लावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची आठवण करत झाडांच्या अभावामुळे ते पुर्ण होऊ शकले नाही, ही अठवणही यावेळी त्यांनी काढली. ‘स्वच्छता अभियान’ हा तिसरा संकल्प असून प्रत्येक रस्त्यावर, परिसरात आणि शहरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना या मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन मोदी यांनी केले.