ठाणे : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात भल्या पहाटे ट्रक आणि मिजी बसचा अपघात झाला. ट्रकचा एक्सेल तुटल्याने चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले आणि बाजूने जाणाऱ्या मिनी बसला धडकून पलटी झाला. गुजरातवरून हा ट्रक रिकाम्या दारूच्या बाटल्या घेऊन ठाण्याच्या दिशेने येत होता. या अपघातामुळे येथे जड अवजड वाहनांची काही तास कोंडी झाली होती.
Mumbai News : विक्रोळी, पंतनगर, भांडूप, विजय गार्डनर मेट्रो स्थानके पादचारीपुलाने जोडणार!
गुजरात ते मुंबई अशी वाहतूक करणारा ट्रक (GJ 02 VV 3808) मंगळवारी पहाटे ३:०० च्या सुमारास गायमुख घाटाजवळ वाहतूक चौकीच्या बाजूला पलटला. ट्रकमध्ये असलेल्या दारूच्या काचेच्या रिकाम्या रस्त्यावर पसरल्याने सगळीकडे काचांचा खच पडला होता. जवळच चौकीत असलेले वाहतूक पोलिस जयदत्त मुंढे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवून अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. लागलीच या विभागांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन हायड्रा मशीन आणि जेसीबीच्या मदतीने पलटी झालेला ट्रक बाजूला केला.
या अपघातात मुलुंड आगाराच्या बसला देखील (MH 01 EM 3914) ट्रकची धडक बसली होती. त्यात बसचे किरकोळ नुकसान झाले. तर ट्रकची बॉडी पूर्णपणे सडल्याने तो बाजूला करण्यासाठी बराच वेळ लागला. सुदैवाने मुलुंड मिरा रोडच्या मार्गावर धावणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी संभाव्य हानी टळली. परंतु बस वाहक (कंडक्टर) हर्षल कासकर, वय ३२ यांच्या एका डोळ्याला दुखापत झाली. काचेचा तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला. अपघाताच्या घटनेमुळे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सुमारे तीन तास कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीत सापडलेला रस्ता सकाळी ६-७ वाजता मोकळा झाला.