मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत सध्या असह्य उकाडा सहन करावा लागत असून पुढील दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा, उन्हाच्या झळा आणि काहिली यामुळे मुंबईकर अक्षरशः पोळून निघाले आहेत. मुंबईच्या तापमानात सतत चढ उतार सुरू आहेत. अचानक तापमानात वाढ होते तर कधी अचानक घट होते. या वातावरणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.
मार्च महिना सुरू झाला तरी तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-जास्त होत असल्याचेही दिसून आले. तीच परिस्थिती या महिन्यातही कायम आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी अंश ३३.९ सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तापमान कमी नोंदले गेले असले तरी, कोरड्या, उष्ण वाऱ्यांनी उकाड्याची जाणीव अधिक त्रासदायक झाली आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमानाचा पारा २४ ते २६ अंशापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळीही अस्वस्थता जाणवू शकते. तर, कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशापर्यंत असेल. या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल, त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकेल.
मागील आठवड्यात मुंबईतील तापमानात सलग चार ते पाच दिवस घट झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना तापमान दिलासा मिळाला होता. मात्र, उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस मुंबईकरांना हा उकाडा सहन करावा लागणार आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्पाचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता आहे.