‘पारसमणी’ हा १९६३ सालचा सिनेमा. काहीशी माला सिन्हासारखी दिसणारी गीतांजली आणि साधाभोळा महिपाल यांच्यासोबत होती अरुणा इराणी, नलिनी चोणकर, मारुती राव, उमा दत्ता, जुगल किशोर आणि एका गाण्यापुरती येऊन गेलेली अतीव सुंदर दिसलेली तरुण हेलन! निर्माते होते बच्चूभाई मिस्त्री आणि पंडित मधूर. या काहीशा गूढ, पौराणिक वाटणाऱ्या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते बाबुभाई मिस्त्रींनी!
हा एक फँटसी सिनेमा होता. अर्धे चित्रण कृष्णधवल आणि उरलेले इस्टमन कलरमध्ये झालेला पारसमणी त्यावेळी चांगला चालला. लगेच १९६४ ला त्याचे तमिळमध्ये डबिंग होऊन तो दक्षिणेतही गेला.
पारसमणीची कथा एखाद्या परीकथेसारखी सरळसोट होती. एक राजा असतो. त्याचे जहाज वादळात सापडल्याने त्याच्या सेनापतीचा छोटा मुलगा (पारस) अज्ञात बेटावर एकटाच सापडतो. तेथील एक माणूस त्याचे पालनपोषण करतो. तरुणपणी तो एक कुशल तलवारबाज योद्धा आणि उत्तम गायकही होतो. त्याच्या गायनकौशल्याची कीर्ती राजापर्यंत पोहोचते. राजा त्याच्या गाण्याचा कार्यक्रम राजवाड्यात ठेवतो. गाणे एकूण खूश झाल्यावर राजा त्याला ‘हवे ते मागायला’ सांगतो. दरम्यान हा नायक आधीच राजकन्येच्या प्रेमात पडलेला आहे. तो तिच्याशी लग्नाची इच्छा राजाकडे व्यक्त करतो. यावर राजा संतापतो. तो नायकाला दंड देण्याचे ठरवतो आणि इथेच फँटॅसीचा भाग सुरू होतो!
राजाला एक शाप आहे. जेव्हा राजकन्येचा विवाह होईल तेव्हा त्याला मृत्यू येणार असतो. त्यावर उपाय म्हणजे पारसमणीचे दर्शन! अत्यंत ‘अप्राप्य असलेले हे रत्न राजाला मिळाले तर मात्र तो वाचणार.’ अशा उ:षापाची सोय मूळ कथेतच केलेली असल्याने राजा नायकाला शिक्षा ठोठावताना म्हणतो, ‘तू मला पारसमणी आणून देशील तर तुझे लग्न राजकन्येशी लावता येईल!’ या आश्वासनासह राजा नायकाची बोळवण करतो. त्यानंतर नायकाने, म्हणजेच सेनापतीपुत्राने अनेक संकटांना तोंड देऊन या अटीची केलेली पूर्तता म्हणजे हा सिनेमा!
पारसमणीचे नितांत मधूर संगीत होते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे. एकापेक्षा एक लोकप्रिय झालेली गाणी होती असद भोपाली यांची! सगळी गाणी लोकांच्या ओठावर बसली होती. लतादीदीने गायलेले ‘उई माँ, ऊई मां, ये क्या हो गया, उनकी गलीमे दिल खो गया” दीदीने कमल बारोट यांच्याबरोबर गायलेले “हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फें, रंग सुनेहरा” किंवा तिने रफीसाहेबांबरोबर गायलेले “वो जब याद आये, बहुत याद आये” हे अजरामर गाणे लोकप्रियतेच्या शिखरावर होते. ‘हसता हुवा नुरानी चेहरा’ तर १९६३च्या वार्षिक ‘बिनाका गीतमाला’त ६व्या नंबरला आले होते!
असद भोपालींचे असेच एक जबरदस्त गाणे होते. दृश्य असे होते महिपाल (पारस) राजकुमारीला नाचायला भाग पाडतो आहे. पुढे तेच दृश्य त्यांच्यातील प्रेमाची सुरुवात ठरते. भोपालीसाहेबांनी लिहिलेले राजकन्येच्या मन:स्थितीचे वर्णन करणारे ते शब्द होते-
‘मेरे दिलमें हलकीसी,
वो खलिश है, जो नहीं थी,
कहीं प्यार हो ना जाए.
कहीं प्यार हो ना जाए!’
या गाण्यातील एक संमोहित करणारा भाग म्हणजे गाण्यात जेव्हा जेव्हा ध्रुवपदाची ओळ येते तेव्हा पार्श्वभूमीवर वाजणारी बासरीची एक अगदी क्षणिक पण विलक्षण गोड लकेर! गाण्याचा बेधुंद वेग हाही एक लक्ष वेधून घेणारा, जणू मानसिक नजरबंदी करणारा भाग होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलेल्या अनेक अवीट गोडीच्या गाण्यात याचा नंबर खूप वर लागायला हवा.
‘खलीश’ म्हणजे बोच. टोचणी. राजकन्या आधी पारसवर त्याच्या आडदांड वर्तनामुळे रागावलेली असते. पण त्याचे सितारवादन पाहून त्याच्यातल्या कलाकाराकडे मात्र आकृष्ट होते. त्यातूनच तिच्या मनाची द्विधा मन:स्थिती होते. ती म्हणते आधी तर माझे सगळे ठीक चालू होते. पण आज अचानक ही गूढ बोचणी मनाला का लागलीये कोण जाणे? मी प्रेमात तर पडत नाहीये ना? नको रे बाबा तसले काही व्हायला!
प्रेमात पडलेल्या कुणाचेही असेच होते. मनाला पुढच्या अस्थिरतेची एक चिंता सतावू लागते. त्या काळच्या युवतींच्या मनावर तर एवढे दडपण असे की प्रेमात पडून आपण काही गुन्हा करतोय की काय अशी मनाला सतत बोचणी लागून राहायची. त्यात तारुण्यसुलभ ओढ मनाला आणि शरीराला अद्भुत भावविश्वात घेऊन जायची. आपण काय करतोय, काय बोलतोय, काय विचार करतोय याचे भानच हरपून जायचे. म्हणून राजकन्या गाण्यात म्हणते – ‘माझे त्यांचे संभाषणच मला आठवत नाही. मी काय बोलले, ते काय बोलले, मी काय ऐकले तेही उमगत नाही. आम्ही एकमेकाला नुसते बघतच उभे राहिलो! आणि होय, त्याच क्षणी काहीतरी अद्भुत घडले. माझ्या मनातून एक हुंकार उठला आणि आतून जाणवले ‘मी प्रेमात तर पडत नाहीये ना?’ पाठोपाठ माझे मनच मला सांगू लागले, ‘नको नको, हे असे नकोय व्हायला!
‘जाने क्या सुन लिया,
जाने क्या कह गए?
वो हमें हम उन्हें
देखते रह गए.
इक बात हुयी, समझा
ना कोई.
मेरे दिलसे निकली हाय!
कहीं प्यार हो ना जाए.’
पण वरवर तिच्या मनातला हा गोंधळ, तिचा हा लटका नकार काही फार काळ टिकणारा नसतो. शेवटी प्रेमात पडल्यावर माणसाच्या आत खोल जेजे काही अद्भुत घडते त्याची मजा, धुंदी काही वेगळीच असते. मनात उठलेले एक भयकारी वादळ चक्क एक साहस वाटू लागते. हृदयातली सतत उठणारी धडधड मनात एक वेगळेच संगीत जागे करते. आधीची मनाची स्थिरता जाऊन प्रेमामुळे आलेली सततची घालमेलसुद्धा मनाला आवडू लागते. अन् मग राजकन्येची स्त्रीसुलभ लज्जा तिला आठवण देते, ‘माझा नकार कुठे होकारात न बदलून जावो रे देवा!’
‘दिलकी धड़कन कभी,
इतनी प्यारी ना थी.
यूँ तो हर चीज़ थी, बेकरारी ना थी.
ये डर है मुझे, इनकार मेरा,
इकरार हो ना जाए..
कहीं प्यार हो ना जाए.
मेरे दिलमें हलकीसी…’
अवघ्या १८/१९ ओळीत तारुण्यातील एका अकल्पित, अवर्णनीय, अद्भुत भावनेचे इतके यथार्थ वर्णन करणारे कवी खरे तर मानसशास्त्रज्ञच म्हटले पाहिजेत आणि त्यांना भेटायचे असेल तर ‘नॉस्टॅल्जिया’ला पर्याय नाही!
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…