कठड्यांनी अडवली जागा,हिरवळ राखण्याची मागणी
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या डागडुजीचे काम सुरु असून या अंतर्गत झाडांच्या बुंध्याभोवती विटांचे बांधकाम करून कठडे बांधले जात आहे. मात्र, हे कठडे बांधताना झाडांच्या मुळाभोवती नियमांभोवती जागा सोडली जात नसून परिणामी या झाडांभोवती केल्या जाणाऱ्या कठड्यांच्या बांधकामाला भविष्यात तडे जावून ते तुटले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे झाडांना संरक्षण देण्यासाठी हे कठडे बांधले जात आहेत की कठडे लवकर तुडले जावून पुन्हा नव्याने बांधकाम करण्यासाठी त्यावर पुन्हा पैसे खर्च केले जावे यासाठी हे बांधकाम केले जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्याना परिसराचे सुशोभीकरण केले जात असल्याचा प्रचार सध्या उबाठा शिवसेना आणि स्थानिक आमदारांच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र, शिवाजीपार्कमध्ये सुशोभीकरणाचा कोणतेही काम नसून केवळ डागडुजीची कामे हाती घेण्यात आली आहे. उद्यान परिसरातील तुटलेले बाकडे, झाडांभोवतीचे कठडे, तुटलेल्या जाळ्या, तुटलेले पेव्हरब्लॉक आदी प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत झाडांभोवतीच्या तुटलेल्या कठड्यांसह तुटलेले पेव्हरब्लॉक बदलण्याची कामे सुरु आहेत. परंतु हे काम करतानाच वृक्षांभोवती नव्याने विटांचे बांधकाम केले जात असून हे कठडे अगदी खोडापासून एक फुट जागा सोडून बांधले आहेत. त्यामुळे झाडांभोवती किमान एक मीटर बाय एक मीटरची जागाही सोडली जात नाही. तसेच जर एवढी जागा सोडल्यास या लोकांना याठिकाणांहून चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येथील जागा सोडली जात नसून हे बांधकाम न करता या झाडांभोवती जमिनी समांतर हिरवळ निर्माण केल्यास लोकांना चालताही येईल आणि झाडांच्या कठड्याभोवती होणाऱ्या बांधकामाचा खर्च टाळता येवू शकतो.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार झाडांभोवती कठड्यांची नव्याने बांधकाम करण्याची गरजच नसून जे यापूर्वी बनवले आहेत, त्यांना तडे गेले आहेत. तसेच त्यांच्या मुळांभोवती उंदिर,घुशींमुळे माती पोखरली जाते. उलट कठड्यांमुळे जागा जास्त अडली जात असून येथील झाडांच्या फांद्यांचे शास्त्रोक्तपणे छाटणी केल्यास तसेच मुळाभोवती हिरवळीचा पट्टा तयार करणेच योग्य असून हे कठडे बांधल्यानंतरही यापुढे भविष्यात त्यांना कठडेच जाणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.