ज्योतिरादित्य शिंदे यांची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली : भारत दूरसंचार निगम लिमीटेडने (बीएसएनएल) गेल्या ७ महिन्यात ५५ लाखांहून अधिक नवीन ग्राहक सामील झाले आहेत, ज्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या ९.१ कोटी झाली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
यासंदर्भात शिंदे यांनी सांगितले की, जून २०२४ ते या वर्षी फेब्रुवारीपर्यंत बीएसएनएल ग्राहकांची संख्या ८.५५ कोटींवरून ९.१ कोटी झाली आहे. बीएसएनएल तब्बल १८ वर्षांनंतर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत नफ्यात आली आहे. देशभरातील ज्या गावांमध्ये मोबाईल सेवा पोहोचलेल्या नाहीत, तिथे ४-जी मोबाईल सेवा पुरवण्यासाठी बीएसएनएल एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याची एकूण किंमत २६,३१६ कोटी रुपये आहे. यामध्ये विद्यमान २-डी बीटीएसला ४-जी मध्ये अपग्रेड करणे देखील समाविष्ट आहे. याशिवाय, बीएसएनएल एलडब्ल्यूई फेज-1 योजनेअंतर्गत स्थापित केलेल्या २३४३ विद्यमान २जी बीटीएसचे २जी ते ४जी पर्यंत अपग्रेडेशन देखील करत आहे, ज्याची अंदाजे किंमत १८८४.५९ कोटी रुपये असल्याचे शिंदे म्हणाले.
भारत 4-जी नेटवर्क उपकरणे तयार करणारा जगातील पाचवा देश बनला आहे. देशात एक लाख 4-जी टॉवर बसवण्याचे लक्ष्य साध्य केल्यानंतर बीएसएनएल ५-जीची अंमलबजावणी सुरू करेल. सुमारे ७३. ३२६ 4-जी टॉवर बसवण्यात आले आहेत, जे एकूण कामाच्या सुमारे ७३ टक्के आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
भारतात 5-जी ची अंमलबजावणी जगात सर्वात जलद झाली आहे आणि गेल्या एका वर्षात ९९ टक्के जिल्हे आणि ८२ टक्के लोकसंख्या या योजनेत समाविष्ट झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.