नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. विधेयकाच्या बाजूने २८८ मते मिळाली तर त्याच्या विरोधात २३२ मते मिळाली. आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल.
भाजपचे सहकारी पक्षांनी या विधेयकाला खुलेपणाने समर्थन दिले तर विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की अल्पसंख्यांकासाठी भारतापेक्षा सुरक्षित जागा जगात कुठेही नाही आणि ते सुरक्षित आहेत. कारण बहुसंख्यांक पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहेत.
वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ वर साधारण १२ तास चर्चा सुरू होती. १२ तासाच्या चर्चेनंतर या विधेयकाला अखेर मंजुरी मिळाली. आता या विधेयकावर आज म्हणजेच गुरूवारी राज्यसभेत चर्चा होईल. वरिष्ठ सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर वक्फ दुरुस्ती कायदा अस्तित्वात येण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल.
सुधारित विधेयकानुसार वक्फ बोर्डात मुसलमानांसह चार बिगर मुसलमान सदस्य असतील. यातील दोन महिला असतील. तसेच जे किमान पाच वर्षे इस्लामचे पालन करतात त्यांनाच त्यांची मालमत्ता वक्फमध्ये हस्तांतरित करता येईल. यासोबतच त्यांनी हे देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की हे विधेयक कोणाच्याही धार्मिक श्रद्धेत हस्तक्षेप करणारे नाही तर ते केवळ वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी आहे.