ठाणे : ठाणे महापालिकेने सन २०२४-२५ या वर्षात पाणी बिलांपोटी १४८ कोटी ९५ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले आहे. गतवर्षीपेक्षा ही वसुली १५ कोटी रुपयांनी अधिक आहे. पाणी पुरवठा विभागाने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेरच्या दिवशी सात कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळाले.
दिवा आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित; अनधिकृत टँकर भरणा केंद्रही केले बंद
ठाणे महापालिकेच्या अर्थसंक्लपीय तरतुदीनुसार, पाणी ग्राहकांकडून सन २०२४-२५च्या चालू वर्षाच्या बिलांपोटी १४७ कोटी रुपये तर थकबाकीपोटी ७८ कोटी रुपये असे एकूण २२५ कोटी रुपये वसूल करायचे होते. या वर्षी चालू बिलांच्या रकमेपोटी ९४ कोटी ५४ रुपये वसूल झाले आहेत. तर, थकबाकीपोटी ४० कोटी ४१ लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर,मुख्यालय येथे १४ कोटी रुपयांच्या बिलांचा भरणा झाला आहे. या आर्थिक वर्षात एकूण १४८ कोटी ९५ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
पाणी पुरवठा विभागाने अधिकाधिक वसुली करून उद्दीष्टपूर्ती करावी,असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यानुसार, सप्टेंबर-२०२४मध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाचे मीटर रिडर, उपअभियंता, प्रभाग समितीतील कर्मचारी, सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या प्रयत्नांमुळे गेल्यावर्षीपेक्षा १५ कोटी रुपयांची अधिक पाणी बील वसुली करणे शक्य झाल्याचे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले.