मुंबई : हिंदू नववर्षातील पहिला सण तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा सण म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa 2025). संस्कृती जपत हिंदू परंपरेनुसार विचारांची नवी गुढी उभारत भारतातील अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. यादिवशी महाराष्ट्रातील अनेक घरांत गुढी उभारुन तिची पुजा करुन गोडाधोडाचं नैवद्य दाखवले जाते. तसेच यावेळी प्रसाद म्हणून कडुलिंबाचं पान आणि गुळ देण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथेमागचं नेमकं कारण काय आणि कडुलिंब व गुळ खाण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.
काय आहे कारण?
चैत्र महिन्यात गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) साजरा केला जातो. या काळात उष्माघात होणे किंवा खूप उन्हात राहिल्यास आजारपण येणे या गोष्टी होऊ शकतात. आपण जे सण साजरे करतो, ज्या परंपराचे पालन करतो त्यामध्ये काहीतरी शास्त्रीय कारण असते. गुढीपाडव्याला कडुनिंब (Neem Leaves) आणि गुळ (Jaggery) खाण्याची पद्धतीमागेही असेच शास्त्रीय कारण आहे.
उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे त्वचेशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो, कडुनिंब त्याची शक्यता कमी करण्यास मदत करते. आयुर्वेदामध्ये कडूनिंबाला खूप महत्त्व दिले जाते. कडुलिंब हे १२ महिने सातत्याने उपलब्ध होते. याशिवाय कडुनिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतात आणि मधुमेहाचा धोका टाळतात. गुळात चमत्कारिक गुणधर्म आहेत. गुळ हा साखरेला सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे. त्यामुळे कडुलिंब व गुळ खालले जाते.
कडुलिंबाचे फायदे
कडुलिंब उन्हाळ्यात शरीराला मौसमी आजारांपासून वाचवते. त्वचारोगपासूनही दूर राहिले जाते. कडुलिंबाची पेस्ट केसांच्या मुळांवर लावल्यास कोंड्याची समस्याही कमी होते. कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि एकूणच आरोग्य सुधारते. अपचन, गॅस, आतड्यांतील जंतू नष्ट करणे लिव्हर मजबूत ठेवण्याचे काम कडुलिंब करते. (Benefits Of Neem)
गूळाचे फायदे
गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. गूळ खाल्ल्याने ॲसिडिटीची शक्यता कमी होते. गुळातील खनिजे, कर्बोदके आणि पोषक घटक हवामानातील बदलामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत करतात. तसेच, गूळ हा संतुलित आहाराच्या श्रेणीत येतो. त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच सौंदर्याच्या क्षेत्रातही अनेक फायदे होतात. (Benefits Of Jaggery)