खोपोली : मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे. नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार, हे नुतन पंचांगात नमुद केले आहेच महाराष्ट्रात गुढी उभारून या नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मात्र, आता या गुढीला लागणाऱ्या नव्या बांबूंची किंमत दुप्पटीने वाढली आहे हेही तितकेच खरे आहे. शहरी भागात तर बांबूंची काठी मिळणे दुरापास्त झाले आहे. बव्हंशी बांबूकाठी ग्रामीण भागातून मिळते. पण वाढतं प्रदूषण, माकडांचा उपद्रव आणि काटा येणे आदी कारणांमुळे बांबूचे उत्पादन घटत चालले आहे.
कोकणात बांबूला मानगा, चिवा आदी नावानेही ओळखले जाते. हा बांबू कुंपणाच्या कडेने उगवतो. काही ठिकाणी याची शास्त्र शुद्ध लागवड केली जाते मात्र वाढत्या महागाईमुळे, याची लागवड करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. मिरगानंतर कोंब येतात, त्यावेळी ते कोंब माकड- हत्ती फस्त करतात. याचा परिणाम सलग वाढीवर होतो. बांबूला बुरूड कामातही मागणी असते रेती व्यवसाय, मांडव स्टेज डेकोरेशन, काजू-आंबा काढण्याची काठी आदीमुळे बांबूची उचल ठेकेदार मार्फत होते.
सध्याच्या वाढत्या महागाई मुळे बांबूंच्या किमतीवर परिणाम होत आहे त्यात बांबूंची बेटे हवामान व नैसर्गिक कारणांमुळे नष्ट होत आहेत. या नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीला नवीन बांबू उभारण्याची काही ठिकाणी पद्धत आहे, तर काही ठिकाणी पुनर्वापर होतो मात्र, वरील सर्व कारणांमुळे, बांबूंचे दर हे गगगनाला भिडलेले दिसत आहेत.