मुंबई : केंद्र सरकारकडून (Central Government) देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यामधेच रेशनकार्ड (Ration Card) योजनेचा समावेश असून या योजनेतून गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्य पुरवण्यात येते. मात्र दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू गरजूंनाच मिळाव्या. त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने याच रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या इ-केवायसी प्रक्रियेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शिधाधारकांनी लवकरात लवकर इ-केवायसी करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
NMMC recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नवी मुंबई महापालिकेत ६२० पदांची भरती
शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया असून ई-केवायसीसाठी (Ration Card e-KYC) सरकारने ३१ मार्च २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. आता अंतिम मुदतीसाठी काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेचा लाभ घेणाऱ्यांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा लाभ बंद होण्यासोबतच शिधापत्रिकेतून नाव देखील कमी केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
रायगडमधील ३० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण
राज्यातील रेशन कार्ड धारकांना (Ration Card) घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु अद्यापही रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ३०.९२ टक्के लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. अनेक कार्डधारकांना अंगठ्याचे स्कॅनिंग ई-पॉस मशीनवर होत नसल्यामुळे त्रास होत होता. आता त्यावर तोडगा म्हणून ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.
दरम्यान, सुरुवातीला केंद्र सरकारकडून ई-केवायसी प्रक्रियेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी ती वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना रेशनचे धान्य मिळण्यमध्ये अडचण येऊ शकते. (Ration Card e-KYC)