Saturday, April 19, 2025

कैलास जीवन

सेवाव्रती:शिबानी जोशी

एक राष्ट्रीय स्तरावरचे कीर्तनकार कीर्तन करता करता आयुर्वेदिक औषधांची आवड बाळगतात. त्याच आवडीतून वेगवेगळे आयुर्वेदिक झाडांचे उपयुक्त धर्म-गुणधर्म जाणून घेतात आणि त्यातूनच संशोधन करत करत एक चमत्कारी औषध बनवतात. ते औषध इतके परिणामकारक ठरते की, आज सत्तर वर्षं ते औषध वापरले जात आहे. त्या औषधाचं  एक वैशिष्ट्य म्हणजे ते पोटात घेता येते व त्वचेवर बाहेरूनही लावता येते, म्हणजेच शरीराच्या अंतरबाह्य दाहाला कमी करण्याचे काम करते. ते आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन म्हणजे ‘कैलास जीवन’. जाणून घेऊया  ‘आयुर्वेद समशोधनालय’ या कंपनीची कहाणी.

वासुदेव शिवराम कोल्हटकर कीर्तनकार, सुमारे ६०, ७० वर्षांपूर्वी, त्यांच्या घरी काही नैसर्गिक औषधी वनस्पतींवर काम करत होते आणि त्यांना असे इमल्शन सापडले जे त्यांना विविध बाह्य तसेच अंतर्गत आरोग्य समस्यांवर चमत्कारीकरीत्या प्रभावी ठरू शकते असे आढळून आले. त्यांनी एका प्रयोगाच्या रूपात सुरू झालेले कैलास जीवन आता आयुर्वेदिक औषधांमधील सर्वात विश्वासार्ह ब्रँडपैकी एक बनले आहे. सध्याचे संचालक एस. व्ही. कोल्हटकर, परेश एम. कोल्हटकर आणि वेधास एम. कोल्हटकर  हे आहेत.  पण सुरुवातीचा इतिहास मनोरंजक आहे. कोल्हटकर स्वतः कीर्तनकार असल्यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी कीर्तन करीत, त्या त्या ठिकाणी तिथल्या प्रेक्षकांना हे क्रीम वाटत असत. हळूहळू लोकांना ते उपयोगी वाटू लागले आणि मागणी वाढू लागली. मागणीप्रमाणे ते स्थानिकांना   विकण्याची व्यवस्था करू लागले आणि मग इंदूर, बेळगाव, बडोदा, कोलकाता, गोवा, हुबळी, धारवाड, अजमेर, दिल्ली इत्यादी ठिकाणी जिथे मराठी लोकसंख्या लक्षणीय होती, तिथे या उत्पादनाची विक्री सुरू झाली.  त्यांच्या प्रवासात, त्यांना  घरातल्यांची साथ तसेच कीर्तनातील साथीदारांची साथ मिळू लागली. सुरुवातीला घरगुती स्वरूपात अगदी स्टोव्ह,  बर्नरवर कैलास जीवन निर्मिती होत असे. आज स्वयंचलित यंत्रसामग्रीच्या सहाय्याने  त्याची निर्मिती होत आहे. नंतरच्या काळात त्यांच्या पुढच्या पिढींनी कैलासजीवनचा विस्तार आणखी मोठा केला.उत्पादनाच्या विस्तार होत गेला तसा जागेचा प्रश्न महत्त्वाचा बनला. पुण्याजवळील धायरी इथे   एक अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात आले. नवीन उत्पादन युनिट सुरू झाल्यामुळे   घरगुती व्यवसायाने   खूपच अत्याधुनिक वळण घेतले.

उत्पादन प्रक्रियेला गती मिळाली, तसेच स्वच्छता राखणे सोपे झाले. आज ५० जणांचा स्टाफ तिथे काम करत आहे. नवीन यंत्रसामग्री बसवल्याने उत्पादन वाढले. यामुळे मार्केटिंग वाढवणे आवश्यक होते. परदेशातून चौकशी सुरू झाली. कंपनीने गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये आपले नेटवर्क वाढवायला सुरुवात केली. यासाठी जाहिरात सेल्स मार्केटिंग निर्यात ही उद्योग वाढीची सर्व तंत्र आत्मसात केली. व्यवसायात जाहिरातीचे खूप मोठे स्थान आहे. विशेषतः ग्राहक उपयोगी वस्तूंसाठी, तर  हजारो लोकांपर्यंत एकाच वेळी पोहाेचवण्याचा जाहिरात हा उत्तम मार्ग आहे. आणि ती निवड अचूक ठरली, असे कैलास जीवनचे व्यवस्थापकीय संचालक परेश कोल्हटकर यांनी आवर्जून सांगितले. कोल्हटकर यांनी यासाठी संशोधन हाती घेतले  होते. त्यांनी वर्तमानपत्रे, रेडिओ, होर्डिंग्ज, पत्रके, टीव्ही, बातम्या, मासिके इत्यादींवर प्रयोग केले. १९८१ मध्ये, जेव्हा दूरदर्शन हे एकमेव टीव्ही चॅनेल होते, तेव्हा ‘गजरा’ हा कार्यक्रम खूप गाजत होता, या कार्यक्रमांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आणि   कैलास जीवनचे नाव घरोघरी पोहोचण्यासाठी त्याचा अत्यंत मोठा उपयोग झाला असे परेश कोल्हटकर यांनी सांगितले. वृत्तपत्रात तर पूर्ण पानाची जाहिरात दिली जात असे. इतर राज्यात पोहोचण्यासाठी सुद्धा तिथल्या क्रमांक एकच्या वृत्तपत्रांमध्ये मोठमोठ्या जाहिराती केल्या जात. त्यामुळे गुजरात, राजस्थानसारख्या राज्यातही कैलास जीवनचे नाव सर्व दूर पोहोचले. खूप जाहिरात केली तर प्रॉडक्ट सुरुवातीला ग्राहक घेतील; परंतु ते जर दर्जेदार आणि उपयुक्त नसेल, तर रिपीट ग्राहक मिळत नाही त्यामुळे आपल्या मालाचा दर्जा जपणं आणि त्याची उपयुक्तता राखणे हे महत्त्वाचे असते त्यामुळे चांगले उत्पादन आणि  जाहिरात असे कॉम्बिनेशन केले, तर भरपूर विक्री होते असे मत परेश कोल्हटकर यांनी व्यक्त केले.

कैलास जीवनमध्ये अतिशय उच्च प्रतीचे चंदन, तेल, कापूर असे पदार्थ वापरले जातात. कैलास जीवन हे रात्री एक चमचा पिठीसाखरेतून खाल्ले तर शरीरातील दाह कमी व्हायला मदत होते तसेच बाहेरून त्वचेला भाजले, जळजळ, जखमा झाल्या तरी डोळ्यांना थंडपणा मिळण्यासाठीही वापरता येते. गेल्या ६० ते ७० वर्षांत घरोघरी तीन-तीन पिढ्या कैलास जीवन वापरणारे लोक आपल्याला आढळतात. त्यांच्याविषयी अनुभव विचारले असता परेश कोल्हटकर यांनी अनेक उदाहरणे सांगितली. त्यांची युरोप, रशिया, कॅनडा, अमेरिका येथे निर्यात सुद्धा होते त्यापैकी पोलीश डिस्ट्रीब्यूटर गोव्याला आला होता. तिथे भेटायला गेले असता त्याने ब्रेकफास्ट टेबलवर पावाला कैलास जीवन लावून खाल्ले व पोलीश लोक असे खात असल्याचे त्यांना दिसले आणि ते म्हणाले की, आम्ही रोजच अशा तऱ्हेने ब्रेकफास्टला कैलास जीवन ब्रेडला लावून खातो. कैलास जीवन प्रियांका चोपडा, सारा अली खान, अदिती राव हैदरी यांच्यासारख्या हिंदी तारका सुद्धा वापरतात तसेच सचिन तेंडुलकरच्या घरी सुद्धा कैलास जीवन  वापरले जात. हेमामालिनी यांनीही ‘मै हमेशा युज करती हु’ असे त्यांना भेटल्यावर एकदा सांगितले होते.

कैलास जीवन हे आयुर्वेदिक उत्पादन आहे. आयुर्वेद म्हणजे जीवनाच विज्ञान. आपल्या देशातील फार्मसी किंवा कॉस्मेटिक उद्योगांमध्ये आयुर्वेदाचे स्थान किती आहे? असे विचारले असता कोल्हटकर म्हणाले की, दुर्दैवाने हे स्थान अगदीच नगण्य आहे; परंतु आता त्यात निश्चितच वाढ होत आहे. या क्षेत्रामध्ये अधिक संशोधन झाले तरी आपण आयुर्वेदातील खजिना लोकांसमोर उपलब्ध करून देऊ शकतो, इतकी ताकद आयुर्वेदात आहे. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञ तसेच तरुणांनी आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी जरूर या क्षेत्रात यावे मात्र शुद्धता आणि दर्जा राखावा असे कोल्हटकर म्हणाले. कैलास जीवन नंतर आणखी काही आयुर्वेदिक उत्पादन आपण का उत्पादित करत नाही? असे विचारले असता कोल्हटकर म्हणाले की, बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनात आणखी भर घालण्यापेक्षा आपले   मुख्य उत्पादन अधिक देशात पोहोचवणे आणि देशातल्या प्रत्येक राज्यात पोहोचवणे हे मला जास्त संयुक्तिक वाटते त्यामुळे कैलास जीवन सर्वत्र पोहोचेल यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो. शरीरातील अंतर बाह्य दाह कमी करण्यासाठी कैलास जीवन वापरले जाते. या शीत करणाऱ्या औषधामुळे ‘आयुर्वेद समशोधनालय’ मात्र तेजीत
आहे, हे नक्की.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -