१३ महिन्यांत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारला
मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या १३ महिन्यांत १ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करणाऱ्या ६५,१२,८४६ वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी केवळ १५७ कोटी रुपयांची वसुली वाहतूक पोलिसांनी केली आहे. तर ३६९ कोटी रुपयांची थकबाकी अजूनही राहिलेली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट केली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये ४१ वाहतूक आणि १ मल्टिमीडिया विभागाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ २०,९९,३९६ वाहन चालकांनी दंड भरला असून अद्याप ४४,१३,४५० वाहन चालकांनी दंड भरलेला नाही.
फ्लिकर आणि अंबर दिव्यांवर कारवाई
मुंबई वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करत फ्लिकर आणि अंबर दिवे वापरणाऱ्या ४७ वाहन चालकांविरोधात कारवाई करत २३,५०० रुपयांचा दंड आकारला आला. मात्र, यातील केवळ ७ वाहन चालकांनी ३,५०० रुपये दंड भरलेला आहे. यामध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई ही मरीन ड्राईव्ह परिसरात केली आहे. यामध्ये ३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई आरटीआई कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिसांनी समाधानकारक कारवाई केली असली तरीही अधिकाऱ्यांची व कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत नाही. त्यामुळे दंड न भरलेल्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष वसुली मोहीम राबविण्याची गरज आहे. दंड वसुलीसाठी वाहनचालकांना डिजिटल नोटिसा पाठवाव्यात. मोठ्या थकबाकीदार वाहनधारकांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया राबवावी असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.