Tuesday, April 22, 2025

उठाबशा

प्रा. प्रतिभा सराफ

जुन्या गोष्टींना नावे ठेवायची आणि नवीन गोष्टींचे कौतुक करायचे हा सर्व माणसांचा स्वाभाविक स्वभाव आहे. याविषयी खूप काही लिहिता येईल पण अलीकडेच शेकडो वर्षांपासून भारतात मुलांना कळण्याची एक शिक्षा कशी महत्त्वाची होती, त्यामागे कोणती वैचारिक भूमिका होती हे अलीकडे दाखवून दिले जात आहेत. आपल्यापैकी अनेकांनी ती शिक्षा भोगली असल्याचेही आपल्याला आठवेल. आपले स्वतःचे कान धरायचे परंतु कसे तर उजव्या हाताने डाव्या कानाची पाळी आणि डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी धरून उठबस करायची. मग हे कसं काय महत्त्वाचे आहे तर या कृतीमुळे आपल्या बुद्धीची शक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. अलीकडे वय वाढण्याआधीच मेंदू कमकुवत होतोय, असे वैद्यकीय चाचण्यांनंतर लक्षात आले. जे पदार्थ आपण खातो त्यामुळे पोषणाचा अभाव होऊ शकतो.

हा अशक्तपणा दूर करण्यासाठी लोक ‘ब्रेन- टॉनिक’च्या नावाखाली महागडी औषधे विकली जातात ज्याचे मोठ्या प्रमाणात सेवनही केले जाते. आपल्या मेंदूचे तीन मुख्य भाग आहेत. म्हणजे आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणेच उत्तम कार्य करतो. एखादा विषय समजून घेणे, त्याविषयीचे ज्ञान साठवून ठेवणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी असलेल्या ज्ञानाची आठवण होणे, ज्याला आपण स्मरणशक्ती म्हणू शकतो. या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते, अन्यथा स्मरणशक्तीशी निगडित असलेल्या गोष्टी म्हणजे साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्स डिसिजसारखे आजार उद्भवू शकतात. स्नायूंना सिग्नल पाठवण्याबरोबरच विचार, स्मृती, भावना, दृष्टी, श्वास, भूक अशा विविध शारीरिक, मानसिक आणि भावनिक कार्ये बुद्धी नियंत्रित करत असते. आता आपण फार खोलात जायला नको पण या सर्वांवर उपाय म्हणजे आपले कान धरणे आणि उठाबशा काढणे, इतका सोपा उपाय हाती लागला आहे यासारखा कोणताही मोठा वेगळा आनंद नाही.

आता हा उपाय म्हणे अनेकांना पटला आहे आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांपासून अनेकांनी याला ‘सुपर ब्रेन योगा’ असे नाव ठेवले आणि या नावाखाली विद्यार्थ्यांच्या रोजच्या शाळेच्या उपक्रमाचा भाग म्हणून त्याचा समावेश केला. कमी बुद्धिमत्तेच्या मुलांचीही या प्रकारच्या व्यायामाने एकाग्रता वाढते असे वैद्यकीय दाखले आहेत. काही डॉक्टर त्यांच्या मनोरुग्णांकडून हेच ‘सुपर ब्रेन योगा’ करून घेत आहेत, हेही वाचनात आले. आता लहानपणी मला काय काय शिक्षा केल्या गेल्या ते जरा आठवण्याचा प्रयत्न केला. कान धरून उठाबशा काढणे, पायाचे अंगठे हाताने धरून ओणवे उभे राहणे. बेडूक बनून उड्या मारणे, शाळेच्या ग्राऊंडला पाच फेऱ्या मारणे, वर्गाबाहेर जाऊन उभे राहणे, गृहपाठ म्हणून दिलेला अभ्यास पूर्ण केला नाही तर तो पाच वेळा लिहून काढणे. अक्षर चांगले नसेल तर लक्षपूर्वक कोरीव अक्षर गिरवणे वगैरे. पहिल्या शिक्षण मी आपल्याला माहिती दिली. आता यातील आणखीही काही शिक्षा कशा महत्त्वाच्या होत्या आणि त्या आपण आज रोज करण्याची कशी आणि किती आवश्यकता आहे याविषयीही लवकरच माहिती मिळायची शक्यता आहे. तूर्तास आता शाळेतले शिक्षक मुलांना कोणतीही शिक्षा करू शकत नाहीत, नाही तर त्यांना जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगावी लागते. आई-वडील आपल्याच मुलांना शिक्षा करू शकत नाहीत कारण तो गुन्हा समजला जातो. मग करायचं काय…? स्वतःच्याच लहान-मोठ्या चुकांसाठी दिवसातून एकदा स्वतःला शिक्षा करायची. आपलेच कान आपण पकडायचे आणि उठाबशा काढायच्या.

चला तर मग, ही महत्त्वाची गोष्ट विस्मरणात जाण्याआधीच जाणीवपूर्वक स्वतःचे कान धरून उठाबशा काढू या, बुद्धी तल्लख करू या, स्मरणशक्ती वाढवू या. चांगल्या कार्याची सुरुवात अगदी आसपासूनच करू या! लहानपणी आपल्याला कोणी शिक्षा केली असेल आणि आपण ती भोगत असू तर आपल्याला लाज वाटायची मात्र आता आपणच आपल्याला केलेली ही शिक्षा भोगताना जर कोणी आपल्याला पाहिले तर त्यालाही त्या शिक्षेचा भागीदार करू या. एकमेकांचे कान पकडू या आणि सोबतीने उठाबशा काढू या!
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -