Friday, May 2, 2025

कोकणब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसिंधुदुर्ग

Malvani Bhasha Bhavan : कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार

Malvani Bhasha Bhavan : कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार

सावंतवाडी  : कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचे जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे. साहित्याचा ठेवा असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये येणाऱ्या वर्षभरात अामुलाग्र बदल करण्यात येणार असून काळानुरूप त्यांचे आधुनिकीकरण देखील करण्यात येणार आहे. मोबाईलच्या अधीन झालेली व पुस्तकांपासून व साहित्यापासून दूर जात असलेली नवी पिढी पुन्हा एकदा ग्रंथालयाकडे वळवण्यासाठीदेखील आपण पुढाकार घेतला असून त्यासाठी डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आपण पुढे आणत आहे. त्या दृष्टीने आपण आराखडा व नियोजन केलेले असून संबंधित मंत्र्यांशी बोलून त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या व आवश्यक निधी आपण लवकरच उपलब्ध करणार आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात जिल्ह्यातील ग्रंथालयांची परिस्थिती निश्चितच बदललेली दिसेल, अशी ग्वाही कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

दरम्यान, साहित्याचे जतन करण्याच्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील साहित्यिकांनी सातत्याने संपर्कात राहून संवाद साधायला हवा. सूचना व मार्गदर्शन करायला हवे. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोकणातील साहित्याचा हा ठेवा जतन करण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या विद्याधर भागवत व्यासपीठावर आयोजित केले होते. कोमसाप शाखा सावंतवाडी संयोजित साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२५ चे उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोमसापच्यावतीने पालकमंत्र्यांना मानपत्र अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार गंगाराम गवाणकर, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कोमासापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, ज्येष्ठ कवयित्री उषा परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी परितोष कंकाळ, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शेखर सामंत, वृंदा कांबळी, ॲड. नकुल पार्सेकर, रुजारिओ पिंटो यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मी कणकवलीतील ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रंथालयांची आजची दयनीय परिस्थिती मला चांगली ज्ञात आहे. ग्रंथालयांच्या इमारती अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. साहित्याचे स्टॉलवर साहित्यिकांशी बोलत असताना काही जुने साहित्य यापुढे कसे जतन केले जाईल असा सवाल उपस्थित करण्यात आला. आज वाचक साहित्यापासून दूर जात आहे. मोबाईलच्या इंटरनेटच्या अधीन झालेली नवी पिढी साहित्यापासून लांब होत आहे. या पिढीला पुन्हा एकदा ग्रंथालयांपर्यंत आणण्यासाठी त्यांचे आधुनिकीकरण व डिजिटल तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने देखील आपले प्रयत्न सुरू असून लवकरच त्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. पुढील वर्षीचे साहित्य संमेलन होण्यापूर्वी ग्रंथालयांची परिस्थिती निश्चितच बदलायची आहे. हाच विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे.

साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून मला निमंत्रित करण्यात आले तर काही जणांकडून मी या ठिकाणी कसा योग्य नाही त्याची देखील चर्चा झाली. मी आज या देशात व राज्यात विचारांची लढाई लढत आहे. मी आमदार व मंत्री असलो तरीही मी प्रथम हिंदू आहे व ती माझी भूमिका स्पष्ट आहे. साहित्य संमेलनामध्ये नव्या पिढीचा देखील समावेश असायला हवा. अशा कार्यक्रमांपासून दूर जात असलेली नवी पिढी पुन्हा एकदा या कार्यक्रमांकडे कशी आकृष्ट होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संमेलनाचे उद्घाटक नितेश राणे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments
Add Comment