जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
आज जगात जे मोठेमोठे संत होऊन गेले, त्यांची चरित्रे बघा. त्यांनी कुणीच कर्मकांडे केलेली नाहीत. ते कोणीही अंधश्रद्धेत गुंतलेले नव्हते. कारण आपण जितकी कर्मकांडे करणार, तितके आपण कर्मठ होतो. कर्मठपणा निर्माण झाला की हळूहळू त्याचे जीवन तर कडू होतेच, पण तो बाकीच्यांचे जीवनही कडू करून टाकतो. कट्टर धार्मिक जे आहेत त्यांनीच मानवी जीवनांत धुमाकूळ घातलेला आहे असे तुम्हाला इतिहासावरून दिसून येईल. कट्टर धार्मिक लोकांनीच मानवी जीवनांत अत्यंत दुःख निर्माण केले. अगदी पूर्वी नव्हे तर आजही तेच चाललेले आहे असे तुम्हाला दिसून येईल. हा कट्टरपणा अज्ञानातून येतो. एकदा परमेश्वर नीट समजला, तर कट्टरपणा येणारच नाही आणि आपण म्हणणार सर्व धर्म सारखेच. ‘All roads go to roam’ अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, म्हणजेच सर्व रस्ते रोमला जातात अशी सुंदर म्हण आहे.
त्याचप्रमाणे सर्व धर्म माणसाला परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवतात. सर्वधर्मसमभाव सांगितलेला आहे. सर्वधर्मसमभाव म्हणजे काय? तुला तुझा धर्म प्रिय, इतरांना त्यांचा धर्म प्रिय असू दे. तू तुझ्या धर्मावर प्रेम कर, इतरांना त्यांच्या धर्मावर प्रेम करू दे. आपण सर्वांनी आनंदात राहूया यालाच आमच्या मते सर्वधर्मसमभाव म्हणतात. पण हा असा सर्वधर्मसमभाव सर्वांच्या ठिकाणी नसेल व फक्त एकाच धर्माच्या लोकांच्या ठिकाणी असेल तर त्याचा काय उपयोग? हा सर्वधर्मसमभाव सर्व धर्मातील धर्ममार्तंडांनी सर्व लोकांना शिकविला पाहिजे. पण ते कधी शिकवतील? त्यांना परमेश्वर हा विषय नीट समजेल तेव्हा! खरा परमेश्वर समजत नाही तोपर्यंत खरा धर्म कळणार नाही. आज तीच परिस्थिती झालेली आहे. मला एक आठवते ते म्हणजे पहिले बाजीराव पेशवे हे केवढे पराक्रमी होते. चाळीस लढाया केल्या पण एकदाही पराभव नाही.
दिल्लीपर्यंत जाऊन लढाया केल्या. तुम्ही कल्पना करा नुसते तिथपर्यंत जायचे म्हटले तरी तुमचे अंग मोडून येईल. तिथे जाईपर्यंत तुम्ही दमून जाल व पडून राहाल. तुम्ही रेल्वेने जाणार पण ते घोड्यावरून जात होते व लढाई करत होते. त्यावेळेचे लोक काय होते ! त्यांची निष्ठा काय होती! त्यांची राष्ट्रभक्ती काय होती ! याचा जर विचार केला तरच हे शक्य आहे, नाही तर हे शक्यच नाही. असे हे बाजीराव पेशवे ज्यांनी चाळीस लढाया केल्या पण एकदाही पराभव नाही. त्यांना आपल्याच काही लोकांनी कर्मकांड रितीभातीं पायी वाईट वागविले. कर्मठ लोकांनी त्यांना सुखाने जगूच दिले नाही. परधर्मीय बायको केली म्हणून त्यांना सतावले आणि शेवटी शेवटी तर त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. दुःखाने ते आजारी पडले व त्यातच त्यांचा अंत झाला. ते जर जगले असते तर आपला इतिहास बदलला असता. आज जो इतिहास दिसतो आहे त्यापेक्षा वेगळा इतिहास आपल्याला दिसला असता. पण आपल्याच संकुचित कर्मठ लोकांनी हे नुकसान केले.