माझे कोकण : संतोष वायंगणकर
हवामानामध्ये सतत होणारे बदल गेली काही वर्षे आपण अनुभवतोय. या ऋतुचक्रातील बदलाने बागायतदार शेतकरी, मच्छीमार यांच्या जीवनचक्रातील आर्थिक गणित बिघडतंय. या ऋतुचक्रातील बदलाचे परिणाम आपणाला जागो-जागी दिसू लागले आहेत. या बदलाने विविध क्षेत्रावर थेट परिणाम होताना दिसतो आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एकदा एका मुलाखतीत म्हटले होते, की आता जागतिक स्तरावर जर युद्ध झालेच तर त्याचा कळीचा मुद्दा हा पाणी हाच असेल. अर्थात ‘वॉटर वॉर’ होईल ही भीती जगभरामध्येही अनेकवेळा व्यक्त होताना दिसते. बऱ्याचवेळा जगात ‘कायव झाला तरी त्येची कोकणाक भीती काय नाय’ या अशा गैरसमजातच आपण कोकणवासीय आजवर वावरत आलो आहेत. याचं प्रमुख कारण गेल्या पंचवीस-तीस वर्षांत कोकणात पाणीटंचाई जाणवत नाही. याच प्रमुख कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खा. नारायण राणे असताना त्यांनी कोकणातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नव्हे तर ती कायमस्वरूपी संपविण्यासाठी पाणीटंचाईवर मिशन म्हणूनच राबविण्यात आले. तेव्हा गावो-गावच्या नळपाणी योजना जीवन प्राधिकरणकडून चालविल्या जायच्या या जीवनप्राधिकरणाला हजारो कोटी रूपये कोकणातील पाणीटंचाई संपवण्यासाठी देण्यात आले.
यात कोकणात योग्य पद्धतीचा पाण्याचा उद्भव शोधून नळपाणी योजना ज्याठिकाणी राबविण्यात आल्या नाहीत. त्या गावच्या नळपाणी योजना चांगल्या झाल्या नाहीत. परंतु ज्या गावच्या नळपाणी योजना कार्यान्वित करताना पाण्याचा उद्भव तपासून त्यावर अभ्यासून पुढील पाच-पन्नास वर्षांमध्ये टंचाई येणार नाही याची खात्री पटल्यावर नळपाणी योजना राबविण्यात आल्या. त्या नळपाणी योजनेतून आजही गावो-गावी सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याचे दिसते. मात्र, काही नळपाणी योजना जीवनप्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी नीट न अभ्यासता योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला त्या योजनेतून जनतेला पाणी मिळू शकले नाही. गावात कोणत्याही शासकीय योजनेचे काम सुरू होते तेव्हा जनतेनेही जागृकता दाखवली पाहिजे. कोणतीही योजना कोणत्या विभागाची आहे, त्या कामावर कोणत्या अधिकाऱ्याची देखरेख आहे. कामाची अंदाजित किंमत किती आहे. कामातील बोगसपणा नजरेस येत असेल तर अधिकाऱ्यांना सांगून कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. परंतु हे सगळ करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग आणि अडवणूक असली तर ती केवळ असते. ही टक्केवारीसाठी अडवणूक असता कामा नये. परंतु तसं घडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात यावर्षी पाणीटंचाईचं सावट येणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. कोकणात एप्रिल, मे महिन्यात सरासरी ३८ अंश इतके तापमान असायचे. परंतु यावर्षी मार्च महिन्यातच ४० अंश तापमान आहे.
नदी-नाल्याचे प्रवाह या अति उष्णतेने नदी, विहीरी,ओढे यांच्यातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सुदैवाने कोकणात कधी जशी पश्चिम महाराष्ट्रातील माण, कवठेमहाकाळ, जत यासारख्या भागात जे पाणी टंचाईचे संकट तिथली जनता अनुभवते तो अनुभव खरंतर कोणाच्याही वाट्याला कधीही येऊ नये. इतकी भयावह अवस्था या दुष्काळी भागात असते. मात्र, पाणी टंचाई असताना प. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकरी देखील शेतीतून उत्पन्न घेतो हे विशेष आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प.महाराष्ट्रातील शेतकरी दोन-चार कि.मी. पायपीट करतात. महिला डोक्यावर, कडेवर पाण्याचा हंडा घेऊन दोन-चार कि.मी. वरून पाणी घेऊन येताना जेव्हा आपण पहातो त्या क्षणी आपल्या डोळ्यांत केव्हा पाणी येते हे कोणालाच कळत नाही. हे असे विदारक दृश्य मी पाहिलय. यातला एक किस्साही जाता-जाता सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अजितदादा घोरपडे सरकार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कणकवलीच्या गेस्टहाऊसमध्ये बसलो होतो. बाहेर जोरदार पाऊस कोसळत होता. जुलै महिना होता. त्यामुळे जुलै महिन्यात कोकणात पाऊस कसा आणि किती कोसळणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. तर त्या कोसळणाऱ्या पावसाने तत्कालिन पालकमंत्री अजितदादा घोरपडे सरकार एकटक खिडकीतून त्या कोसळणाऱ्या पावसाकडे पहात होते. मी सहज म्हणून त्यांना म्हटलं, साहेब इतक्या उत्सुकतेने पावसाकडे का पहाताय? त्यावर घोरपडे सरकार एवढेच म्हणाले, सांगली जिल्ह्यातल्या माझ्या कवठेमहाकाळ, आटपाटी तालुक्यातून फिरून या आणि जुलै अखेरीस कवठेमहाकाळ, आटपाटी भागात आम्ही गेलो तर एक थेंबही पाऊस नव्हता. आकाशात ढग जमा झाले की त्या भागातील शेतकरी, ग्रामस्थ एकटक आकाशाकडे डोळे लावून पहात असायचे. आकाशातले ढग तसेच पुढे सरकून जायचे. पाऊस काही पडत नव्हता. परंतु तरीही त्या भागात द्राक्ष शेती उभी राहिली. जिद्दी शेतकरी थांबला नाही हे सारं कौतुकानं पहाता आलं. ताकारी धरणाला कालवा देऊन पाणी दिलं जातय. आज त्या भागात पाण्याची उपलब्धता आहे.
कोकणातील लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना चालना दिली पाहिजे. कोकणात सुदैवाने गेल्याकाही वर्षात मे महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस सुरू होत असल्याने पाणी टंचाईच्या फारकाही झळा सोसाव्या लागल्या नाहीत. मात्र, यावर्षी कोकणातील तापमानाचा पारा आताच वाढलेला आहे. या मार्च महिन्यात ४० अंश तापमान आहे. हे पुढच्या दोन महिन्यात तापमान आणखी वाढणारे आहे. यामुळे नदी, तळी, ओढे, विहिरी यांच पाणी आटणार आहे. पाण्याचे उद्भवच जर कमी झालं तर निश्चितच कोकणात यावर्षी पाणी संकट अधिक गडद होऊ शकत. पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. कोकणातील ज्या नद्यांमधून शहरांना आणि गावांना नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो त्या नदी-नाल्यांमध्येही पाणीसाठे कमी होऊ लागले आहेत. ४०-४० अंश तापमानात नदीतील पाणी फार लवकर कमी होणारे आहे. कोकणातील अनेक भागात अनेक गावांमधून पाणीटंचाईचं हे संकट उभं झालं आहे. प्रशासन पातळीवर या गोष्टींचा फार गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासकीय पातळीवर उपाय योजले जातीलच; परंतु आपणही समाजातील सर्वांनीच या पाणीटंचाईला सामोरे जावं लागेल याचा विचार केला पाहिजे.