नागपूर : नागपूर दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी ५० पेक्षा जास्त आरोपींविरुद्ध गंभीर कलमं लावून गुन्हे नोंदवले आहेत. काही व्हिडिओ आणि मेसेज परदेशी आयपी अॅड्रेसवरून व्हायरल करण्यात आले. नागपूरमधील सामाजिक सलोखा बिघडण्यात आला. अफवा पसरवण्यात आली आणि बाहेरून आलेल्यांनी मध्य नागपुरात दंगल केली, असा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलीस कारवाई सुरू आहे.
नागपूर सायबर पोलिसांनी आरोपींनी वापरलेले मोबाईल आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. काही व्हिडिओ आणि मेसेज बांगलादेशमधून व्हायरल करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समजले आहे. या प्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.
नागपूर दंगलीच्या आरोपींविरुद्ध देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामुळे आरोपींवर मोठ्या शिक्षेची टांगती तलवार आहे. समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या आणि देशविघातक कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिसांकडून सर्व संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नागपुरात झालेल्या दंगलीमागे फहीम शमीम खान या व्यक्तीचा हात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) शहराध्यक्ष आहे.
फहीम खानने दंगलीसाठी दिली चिथावणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नागपुरात झालेल्या दंगलीमागे फहीम शमीम खान या व्यक्तीचा हात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. नागपूर पोलिसांनी दंगल प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये फहीम खानचे नाव आघाडीवर आहे. त्यानेच सोमवारी १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांना जमा केले होते. त्यानंतर त्यानेच पोलिसांना विहिंप आणि बजरंग दलाविरोधात निवेदन दिले. पोलिसांनी याबाबत गुन्हाही दाखल केला होता. मात्र, संध्याकाळी फहीम खानने पुन्हा जमाव जमवला आणि तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे. या दंगलीत फहीम खान मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. फहीम खानवर नागपुरात हिंसा भडकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लोकांना हिंसेसाठी चिथावणी दिल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.
तपास करुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ वर्षांच्या फहीम खानने दहावी पर्यंतचेच शिक्षण घेतले आहे. तो राजकारणात सक्रीय आहे. लोकसभा निवडणुकीत फहीम खान नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी एक होता. निवडणुकीत गडकरी विजयी झाले आणि त्यांच्या विरोधातील फहीमसह सर्व उमेदवारांचा पराभव झाला. निवडणुकीनंतर फहीम खान आता दंगलीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे.