Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईतील वाहतूक सुलभ आणि सोयीची होण्यासाठी बीएमसीकडून जोरदार कारवाई सुरू

मुंबईतील वाहतूक सुलभ आणि सोयीची होण्यासाठी बीएमसीकडून जोरदार कारवाई सुरू

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना सुलभरित्या आणि निर्बंधमुक्त मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नियमित कारवाईसोबतच विशेष मोहीमसुद्धा हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत वर्दळीच्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे तसेच वाहतूक आणि पादचाऱयांना मार्गक्रमण करण्यात अडथळा ठरणाऱ्या बाबींचे तात्काळ निष्कासन केले जात आहे. मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांलगतचे परिसर पादचाऱयांच्या मार्गक्रमणासाठी सुलभ ठेवावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

मुंबईतील वाहतूक सुलभ आणि सोयीची व्हावी, पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, रस्त्यांची स्वच्छता, फेरीवालामुक्त परिसर आदी बाबींचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पादचाऱयांना सुलभरित्या मार्गक्रमण करता यावे, या हेतूने नियमित कारवाईसोबत विशेष मोहीमसुद्धा हाती घेण्यात आली आहे.

याच अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी परिरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, परवाना, अतिक्रमण निर्मूलन, इमारत प्रस्ताव, आरोग्य, आस्थापना, पाणीपुरवठा आदी विभागांचे पथक बनविण्यात आले. परिसर स्वच्छता, पदपथांवरील अतिक्रमण हटवणे, अनधिकृत फेरीवाले हटवणे, बेवारस वाहने हटवणे, प्रतिबंधित प्लास्टिक बॅग बाळगणाऱयांवर कारवाई आदी बाबी या पथकांच्या संयुक्त मोहीमेत करण्यात आल्या.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांच्या वतीनेही पादचाऱयांच्या निर्बंधमुक्त मार्गक्रमणासाठी अधिक तीव्रपणे कारवाई सुरू केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, चर्चगेट रेल्वे स्थानक, मशीद रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रेल्वे स्थानक, रे रोड रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रेल्वे स्थानक, माझगाव रेल्वे स्थानक, भायखळा रेल्वे स्थानक, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणांचा समावेश आहे. विशेषकरुन, वर्दळीच्या ठिकाणी पदपथांवरुन चालताना पादचाऱयांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हे सुनिश्चित केले जात आहे. यापुढेही नियमितपणे कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -