Monday, May 12, 2025

किलबिलसाप्ताहिक

ऋतुरंग

ऋतुरंग
सहा ऋतू येतात
हातात हात गुंफूनी
निसर्गराजा सांगतो
त्यांची आगळी कहाणी

ग्रीष्मात ताप उन्हाच
सुना सुना शेतमळा
डवरलेला गुलमोहर
मनास देई विरंगुळा

वाजत गाजत येतो
मग वर्षा ऋतू धावून
रिमझिम गाण्यात मन
चिंब जाई न्हाऊन

हसत नाचत हेमंत
हळूच उतरतो भूवरी
शेत डोलते पिकांनी
हिरवी साद भरजरी

शरद ऋतू घेऊन येतो
थंडी धुक्यातली भारी
शेकोटीची मजा आणि
हुरड्याची चव न्यारी

हलकेच येतो शिशिर
वाढत जाई गारवा
पानगळ होते सुरू
केसांत फुले मारवा.

वसंताची चाहूल लागता
बहरली पुन्हा सृष्टी
पानाफुलांनी रंग उधळले
देखणी झाली दृष्टी

प्रत्येक ऋतूचा येथे
वेगळाच आहे थाट
अलगद येऊन धरेवर
जणू खेळतो सारीपाट

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) सम्राट शहाजहानने बांधलेला
मुघल साम्राज्यात वाढलेला
लाल वाळूच्या खडकांपासून
भक्कम उभा राहिलेला

यमुना नदीच्या किनारी
हा किल्ला उभा बळकट
दिल्लीतील या किल्ल्याचे
नाव सांगा पटपट ?

२) तेराव्या शतकात ही मिनार
बांधायला सुरुवात झाली
जागतिक वारसा म्हणून
नावारूपास देखील आली

नाव मिळाले या मिनारला
कुतुबुद्दीन ऐबक यांचे
काय नाव दिल्लीतल्या
या प्रेक्षणीय स्थळाचे ?

३) चिरंतन ज्योत येथे
जी कधीच विझत नाही
शहीद सैनिकांसाठी
ती सदा तेवत राही

या भव्य वास्तूच्या भिंतीवर
सैनिकांची कोरली नावे
भारतातील या राष्ट्रीय
स्मारकाचे नाव सांगावे ?

उत्तर -


१) लाल किल्ला
२) कुतुबमिनार
३) इंडिया गेट
Comments
Add Comment