सहा ऋतू येतात
हातात हात गुंफूनी
निसर्गराजा सांगतो
त्यांची आगळी कहाणी
ग्रीष्मात ताप उन्हाच
सुना सुना शेतमळा
डवरलेला गुलमोहर
मनास देई विरंगुळा
वाजत गाजत येतो
मग वर्षा ऋतू धावून
रिमझिम गाण्यात मन
चिंब जाई न्हाऊन
हसत नाचत हेमंत
हळूच उतरतो भूवरी
शेत डोलते पिकांनी
हिरवी साद भरजरी
शरद ऋतू घेऊन येतो
थंडी धुक्यातली भारी
शेकोटीची मजा आणि
हुरड्याची चव न्यारी
हलकेच येतो शिशिर
वाढत जाई गारवा
पानगळ होते सुरू
केसांत फुले मारवा.
वसंताची चाहूल लागता
बहरली पुन्हा सृष्टी
पानाफुलांनी रंग उधळले
देखणी झाली दृष्टी
प्रत्येक ऋतूचा येथे
वेगळाच आहे थाट
अलगद येऊन धरेवर
जणू खेळतो सारीपाट
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) सम्राट शहाजहानने बांधलेला
मुघल साम्राज्यात वाढलेला
लाल वाळूच्या खडकांपासून
भक्कम उभा राहिलेला
यमुना नदीच्या किनारी
हा किल्ला उभा बळकट
दिल्लीतील या किल्ल्याचे
नाव सांगा पटपट ?
२) तेराव्या शतकात ही मिनार
बांधायला सुरुवात झाली
जागतिक वारसा म्हणून
नावारूपास देखील आली
नाव मिळाले या मिनारला
कुतुबुद्दीन ऐबक यांचे
काय नाव दिल्लीतल्या
या प्रेक्षणीय स्थळाचे ?
३) चिरंतन ज्योत येथे
जी कधीच विझत नाही
शहीद सैनिकांसाठी
ती सदा तेवत राही
या भव्य वास्तूच्या भिंतीवर
सैनिकांची कोरली नावे
भारतातील या राष्ट्रीय
स्मारकाचे नाव सांगावे ?
उत्तर –
१) लाल किल्ला
२) कुतुबमिनार
३) इंडिया गेट