बाबरी ढाच्याप्रमाणे कारसेवा करण्याचा विहिंपसह बजरंग दलाचा इशारा
पुणे : गुलामगिरीची, लाचारीची, आणि अत्याचारांची आठवण करून देणारी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढून टाकावी, अशी समस्त हिंदू समाजाची मागणी आहे. अन्यथा बाबरी ढाच्याप्रमाणे कारसेवा करून ही कबर उद्ध्वस्त करण्याचा इशारा विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात येणार आहे.
विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि भेगडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चव्हाण म्हणाले, ‘आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी, विश्वासघात व हिंदू द्वेष यामध्ये घालविणारा, छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे, त्यामुळे कबर हटवली गेली पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरिया कायद्यानुसार वागत आहेत.