उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान

वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम -एकनाथ शिंदे


पुणे: संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.


जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.


वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते. रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला. तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.


पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा सुरु असताना दर्शन बारी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. निसर्गाचे रक्षण करणेही आपले कर्तव्य आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस प्रयत्न शासन करत आहे. नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची चळवळ ही लोकचळवळ व्हावी, देशातील सर्वात आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत असा नावलौकिक करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


ते म्हणाले, तरुण पिढीसाठी संत तुकाराम यांची गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करुन देण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच सर्व शाळांमध्ये हे ई-बुक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chandrapur Tiger Attack : अंधारात थरारक ऑपरेशन; ४ महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात चार महिलांचा बळी घेणाऱ्या टी-2 वाघिणीला अखेर

RCC Classes Shivraj Motegaonkar : NEET वादात आता मीम्सचा पूर; मोटेगावकरांच्या ‘पाणी थेरपी’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

“अरे मोटेगावकरांकडे बघा… विद्यार्थी पास व्हावेत म्हणून थेट अंगावर पाणीच टाकतायत,” अशा आशयाचा एक व्हिडीओ सध्या

Marathwada Pre-monsoon Rains : मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा कहर! वादळी वाऱ्याने घरांची पत्रे उडाली, गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना अक्षरशः

NEET-2026 Paper Leak Case : ‘होय, मीच NEET पेपर फोडला!’; आरोपी मनीषा हवालदारची CBI समोर धक्कादायक कबुली, NTA अधिकाऱ्याचं नावही उघड?

पुणे : देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणात आता सर्वात मोठा स्फोटक खुलासा समोर आला आहे. या

Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी टाळा; कृषी विद्यापीठाचा इशारा

मुंबई : राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी

Pune Accident : सिंहगड किल्ल्यावरून परतताना अपघात; दुचाकी दरीत पडली, तरुण-तरुणी गंभीर जखमी

पुणे : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध सिंहगड (Sinhagad) किल्ला परिसरात एक भीषण अपघात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सिंहगड